बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या ५ जुलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. अन्यथा ७ जुलैला सुरु होणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, अशा शब्दात मेटे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाची लढाई फक्त आजच्या मोर्चापुरती नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरुच राहणार, ही तर फक्त सुरुवात आहे, असंही मेटे यांनी म्हटलं आहे. बीडमध्ये आज विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मराठा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मेटे यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अशोक चव्हाण यांच्यासारखा नाकर्ता माणूस आजपर्यंत झालेला नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा बापट आयोगाच्या शिफारशी फेटाळण्याची मागणी आम्ही केली होती. पण त्याकडे अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केलं. २०१४ ला सुद्धा जे आरक्षण दिलं ते ही चुकीचं दिलं, त्याची फळं आज आपण भोगतोय. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षण अतिशय चांगलं होतं. पण या माणसाच्या मुर्खपणामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे घालवलं, असा घणाघाती आरोपही मेटे यांनी यावेळी केला आहे. इतकच नाही तर मराठा आरक्षण, मराठा समाजाला सवलती आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्या. त्यासाठी ५ जुलैपर्यंतची वेळ देतो. नाहीतर ७ जुलैला होणारं पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा मेटे यांनी दिला आहे.
मराठा समाजाला EWS आरक्षणाचा निर्णयही आपण मराठा मोर्चा जाहीर केल्यावर घेतला गेला. त्यासाठी मी कोर्टात गेल्यानंतर सरकारनं आपल्याला EWS आरक्षण दिलं. त्यामुळे या सरकारला लाथा घातल्याशिवाय यांना जाग येत नाही हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला लाथा घालण्यासाठी आता पुढे या असं आवाहनही मेटे यांनी केला आहे. ही फक्त सुरुवात आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरुच राहील. मराठा समाजातील आमदारांना जर चाड असेल तर ते या आंदोलनाच्या मागे उभा राहतील, असं आवाहनही मेटे यांनी केले आहे.
Read Also :