मुंबई : भाजपचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्रात लोकनेते म्हणून ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीटचं अनावरण करण्यात आलं. या निमित्त गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते ऑनलाईन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जागवल्या. त्याचबरोबर आज जननायक गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, अशी टीका ठाकरे सरकारवर त्यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं. आज लोकनेते, जननायक गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. त्याचबरोबर आमच्या नेत्याचं डाक पाकीट प्रसिद्ध केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार त्यांनी मानले आणि गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Joining virtually, the ceremony to release special cover in honour of Late Gopinathrao Munde ji at hands of Mananeeya @JPNadda ji https://t.co/tkxS0OFgtW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 3, 2021
गोपीनाथरावांना पाहून लोकांना विश्वास वाटायचा’
गोपीनाथ मुंडे यांनी मोठा काळ विरोधी पक्षात घालवला. पुढे युतीची सत्ता आली त्यात ते उपमुख्यमंत्री, गृहमंत्री बनले. त्या काळात ज्या मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत त्यांनी संपवली. गृहमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलंच. सोबतच ते शेतकऱ्यांचे नेते होते. विधानसभेत ज्या प्रमाणे गोपीनाथ मुंडे यांना ऐकण्यासाठी सर्व सदस्यांचे कान आसुसलेले असायचे. त्या प्रमाणे संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात मुंडेसाहेबांना पाहायला, ऐकायला लोक यायचे. गोपीनाथ मुंडे सत्तेत असोत वा नसोत, त्यांचा एक रुबाब कायम होता. मुंडे यांना पाहून लोकांना आपले प्रश्न आता सुटतील असा विश्वास वाटायचा, असंही फडणवीस म्हणाले.
आमचे नेते स्व. गोपीनाथ जी मुंडे यांना आज त्यांच्या स्मृतिदिनी नांदेड येथे भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
खा. प्रतापराव चिखलीकर आणि अन्य उपस्थित होते. pic.twitter.com/f1P2hVQlVQ— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 3, 2021
सपशेल अपयशी ठरलेल्या नेतृत्वाचा पर्दफाश करणार
ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात जोरदार राजकारण रंगलं आहे. भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ओबीसींचं आरक्षण परत मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार केला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या ७ व्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावरील आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं त्यांनी आज जाहीर केलं आहे.