मुंबई : मालाडच्या मालवणीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालवणीत जाऊन दुर्घटनेतील जखमींची चौकशी केली. स्वत: वर असलेल्या जिम्मेदारीचा बोझ हलका करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत पोकळ घोषणा करून सर्रासपणे हातवर केले आहे. कारण ह्या घोषणेची आमंलबजावणी कधी होणार?, प्रत्यक्ष कुटुंबीयांना ती कधी मिळणार?, की तौक्ते चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ, नाशिकातील ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनांसारख्या मदतीच्या घोषणांप्रमाणे ही घोषणा सुद्धा हवेतच तरंगणार, याचा काही ठांगपत्ता लागेनासा झाला आहे.
जून २०२० च्या सुमारास कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. यावेळी ठाकरे सरकारने मदतीचा घोषणा केली. मदत जाहिर करून सुमारे १ वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापही नुकसानग्रस्तांच्या कुटूंबीयांना एक फुटी कवडी सुद्धा मिळाली नाही. त्याचबरोबर, नाशिकमधील, भंडारा, मुंबईसारख्या शहरामध्ये कोरोना काळात ऑक्सिजन गळतीमुळे सुमारे ५८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशावेळी ठाकरे सरकारने केवळ ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करून घटनेवर पांघरून टाकण्याचे काम केले. शिवाय ती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे, तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना मुख्यमंत्र्यांना पॅकेजबद्दल विचारले असता “माझा पॅकेजवर विश्वास नाही, प्रत्यक्ष मदत करणे गरजेचे आहे”, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिली होती. मग, मंत्री महोदय मालाडच्या मालवणीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना केलेल्या ५ लाखाच्या मदतीच्या घोषणेवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा?, एवढे एकदा स्पष्ट करा की.
निसर्ग चक्रीवादळातील मदतीची घोषणा अद्याप कागदावर
जून २०२० मध्ये निसर्ग चक्कीवादळ थैमान घातले होते. यावेळी कोकणकिनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. रायगड, रत्नागिरी, सिंधुर्दुध, कोकण किनारपट्टी, मुंबई, अलिबाग यांसांरख्या शहरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना मोठा फटका बसला होता. वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीला ७५ कोटी आणि सिंधुदूर्गला २५ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली.
त्याचबरोबर शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी ५० हजार रुपये, पक्क्या घराचं पूर्णत: नुकसान झालेल्या कुटुंबांना सुधारित दरांनुसार दीड लाख रुपये, पक्क्या किंवा कच्च्या घरांचं अंशत: (किमान १५ टक्के) नुकसान झालेल्या कुटुंबांना १५ हजार रुपये, नष्ट झालेल्या झोपडीसाठी १५ हजार रुपये, घर पूर्णत: कोसळलेल्या कुटुंबांना कपडे व भांड्यांच्या खर्चासाठी प्रत्येकी ५ हजारप्रमाणे एकूण १० हजार रुपये, नुकसानग्रस्त दुकानमालक व टपरीचालकांना नुकसानीच्या ७५ टक्के मर्यादेत कमाल १० हजार रुपये मदत देण्याची सरकारने घोषणा केली. या गोष्टीला १ वर्ष उलटूनही अद्याप मिळालेली नसून ती कधी मिळणार?, याचा कोणाला अंदाज सुद्धा नाही.
नाशिकातील ऑक्सिजन दुर्घटनेतील घोषणेचे काय झाले?
कोरोना संकटात एकीकडे ऑक्सिजन चणचण भासत असताना दुसरीकडे नाशकातील रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन सुमारे २४ जणांचा हाकणाक बळी गेला. अशावेळी महापालिका प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत जाहिर करण्यात आली. त्याचबरोबर राज्य सरकारकडून ५ लाखाची मदत अशी एकून १० लाखाची आर्थिक मदत जाहिर करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रातील चार वेगवेगळ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनांमध्ये सुमारे ५८ जणांचा मृ्तू झाला. यामध्ये प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत जाहिर करण्यात आली. परंतू ती कधी मिळेल, जाहिर झाल्यानंतर त्यांचे पुढे काय झाले, याची उत्तरे कोणी द्यायला तयार नाही.
तौक्ते चक्रीवादळाच्या घोषणांच काय होणार?
मे महिन्याच्या अखेरीस कोकण किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ धडकले. यामध्ये राज्य शासनाच्या पंचनाम्यानूसार ३७ कोटी १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा अधिकचा असेल, यात दुमत नाही. तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना ठाकरे सरकारकडून ४७ कोटी १५ लाख रुपयांचे पॅकेज जाहिर करण्यात आले. त्यामध्ये मनुष्य हानी ४१ लाख, पशुधन ६ लाख, घरगुती वस्तू नुकसान ११ लाख, घरांची पडझड २५ कोटी, जनावराचे गोठे ३४ लाख, मत्या व्यवस्थित ४ कोटी ८४ लाख, शेती नुकसान १६ कोटी ४८ लाख, असे एकूण ३७ कोटी १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्याचबरोबर कोकण विभागाला एक कोटी ३६ लाख २० हजार, पुणे विभागाला ४४ लाख १३ हजार, औरंगाबाद विभागाला एक कोटीची मदत देण्यात आली आहे. त्यात पुण्यासाठीच्या १६, सातारासाठी २०, सांगलीसाठी ८ लाख, तर सोलापूरसाठी १३ हजार रुपयांचा समावेश आहे. औरंगाबादला १२, जालन्यासाठी १६, परभणी आणि हिंगोलीसाठी प्रत्येकी १२, नांदेड व बीडसाठी प्रत्येकी १६, लातूर आणि उस्मानाबादसाठी प्रत्येकी आठ लाख रुपयांची मदत जाहिर करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही मदत वारसांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. पण ती कोणत्या तारखेपर्यंत मिळणार?, याचे उत्तरे त्यामध्ये नाही.
हेलिकॉप्टरमधून पंतप्रधानांच्या मदतीची घोषणा
पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील नुकसानीची पाहणी केली. अनेक कुटूंब त्यामुळे उद्धवस्त झाली आहेत. त्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. गुजरातला तत्काळ मदतीसाठी १००० कोटीची मदत केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली आहे. तिन्ही प्रभावित जिल्ह्यांमध्ये मुलभूत सुविधा आणि पुनर्निमाणासाठी सर्व प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन मोदी यांनी गुजरातला दिले. परंतू, त्याची कधी प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार याचे कारण गुलदस्त्यातच.
मालाड दुर्घटनेतील घोषणेवर विश्वास कसा ठेवायचा
महाऱाष्ट्रातील इतर घटनांबरोबरच जून २०२० च्या सुमारास धडकेल्या चक्कीवादळातील नुकसान ग्रस्तांना जाहिर करण्यात आलेल्या पॅकेजची अद्याप एक फुटी कवडीही कुटुंबीयांना मिळालेली नाही. त्यामुळे, तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना मुख्यमंत्र्यांना पॅकेजबद्दल विचारले असता “माझा पॅकेजवर विश्वास नाही, प्रत्यक्ष मदत करणे गरजेचे आहे”, अशी स्पष्टोक्ती खुद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिली होती. मग, मंत्री महोदय पॅकेजच्या घोषणेवर तुमचा विश्वास नसताना मालाडच्या मालवणीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना केलेल्या ५ लाखाच्या मदतीच्या घोषणेवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा?, एवढे एकदा स्पष्ट करा की.