नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात केले होते. दरम्यान, वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो.
दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची संधीही सोडली नाही. पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांनी राजकीय प्रचार करू नये, पश्चिम बंगालमध्ये जे झाले ते चुकीचे होते. पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करता कामा नये, मग ते मनमोहन सिंग असतील किंवा नरेंद्र मोदी असतील. बाळासाहेब ठाकरेही हीच भूमिका मांडायचे. तसेच भाजपाला जे यश मिळत आहे ते मोदींच्या चेहऱ्यामुळेच मिळत आहे. मोदी हेच भाजपाचे नेते आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
काल पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेशी पुन्हा मैत्री करण्याबाबत विधान केले होते. ते म्हणाले होते की, “आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती.” उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. तसेच फडणवीस आणि पाटील यांच्याशी जमत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. का ते माहीत नाही. पण इकडे जर वाघाशी दोस्ती असती तर अठरा महिन्यांपूर्वीच सरकार आले असते. मात्र मोदींनी सांगितले तर त्यांचा आदेश आमच्यासाठी आज्ञा आहे. नेत्याचा आदेश म्हटल्यावर आम्ही वाट्टेल ते करू. पण तसे काही जरी घडले तरी निवडणुका या स्वतंत्रपणेच लढविणार.”
Read Also :
- Video : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने पुण्यात साकारले 53 फूट उंचीचे भित्ती चित्र
- प्राधिकरणाचा उद्देश साध्य झालेला नाही; भाजपच्या राम-लक्ष्मणाची जोडी कोर्टात जाणार
- ‘मालाडमधील घटनेत 11 लोकांचा मृत्यू ही शिवसेना शासित BMC कडून योजनाबद्ध हत्या’
- आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला सरकार देणार 600 कोटी
- ‘मुंबई पाण्याने भरी…मुख्यमंत्री बसले घरी’