मुंबई: गाळप हंगाम संपल्यानंतर साखर कारखान्यांकडून नेहमीच उसाची बिले थकवली जातात आणि हे कायमचे आहे. यंदाही महाराष्ट्रात असेच चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. राज्यातील ७३ साखर कारखान्यांनी १ हजार २७७ कोटींची एफआरपीची रक्कम थकवलेली आहे. ७७ कारखान्यांमधील २९ कारखान्यांकडे तब्ब्ल ९१३ कोटी रुपये शेतकरी वर्गाचे अडकून पडल्याने शेतकरी चिंतेत पडलेला आहे. शंभर टक्के देणारे कारखाने हे कमी प्रमाणात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपीची रक्कम दिली आहे.
राज्यात यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल असे सांगण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी यंदा उसाचे मोठे उत्पादन घेतल्यामुळे हंगाम एप्रिलपर्यंत सुरु राहिला. सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांत ऊस मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पिकवलेला आहे आणि त्यामुळेच साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे. राज्यात वर्ष २०२०-२१ मध्ये गाळप झालेल्या उसाची एफआरपी २३ हजार ३२० कोटी ५७ लाख रुपये इतकी देय स्वरूपातील आहे. सदरील रकमेतील २२ हजार ४३ कोटी १३ लाख रुपये शेतकऱ्यांना कारखान्यांकडून अदा करण्यात आलेले आहे.
एकूण एफआरपी देण्याचे प्रमाण बघितले तर ६८ साखर कारखान्यांनी ५०% पेक्षा अधिक एफआरपी देय रक्कम दिलेली आहे. राज्यातील ११७ साखर कारखान्यांनी १००% एफआरपी देय रक्कम दिलेली आहे. शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे पैसे न अदा केलेल्या साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी साखर जप्तीचे आदेश दिलेले आहेत. सर्वात कमी एफआरपी देणाऱ्या कारखान्यांमध्ये लातूरचा पानगेशवर, किसनवीर खंडाळा ५%, तासगाव शुगर २६%, किसनवीर,भुईंज ३२ %, भीमा टाकली ४३% कारखान्यांचा समावेश आहे.
या साखर कारखान्यांमध्ये विद्यमान आमदार आणि मंत्र्यांचा देखील समावेश आहे ही शोकांतिका आहे. आमदार, माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार समाधान अवताडे, माजी आमदार समाधान भोसले, भगीरथ भालके, पंकजा मुंडे या नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. उसाचा रास्त आणि किफायतशीर दार म्हणजेच एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांविरुद्ध साखर आयुक्तालयाने आरआरसीची कारवाई सुरु केलेली आहे. राज्यातील १९० साखर कारखान्यांनी यंदा गाळप केला होता. राज्यातील एकूण १९० साखर कारखान्यांपैकी १०३ कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची पूर्ण रक्कम दिलेली आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे की नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी थकलेली उसाची बिले शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
जप्तीची नोटीस बजावण्यात आलेले जिल्हानिहाय कारखाने
सोलापर जिल्हा: लोकमंगल अॅग्रो, लोकमंगल शुगर्स, श्री विठ्ठल वेणूनगर, विठ्ठल रिफाइंड शुगर, सिद्धनाथ शुगर , गोकूळ माऊली शुगर, जयहिंद शुग, भीमा टाकळी, गोकूळ शुगर्स, श्री. संत दामाजी कारखाना, मकाई भिलारवाडी. बीड: वैद्यनाथ कारखाना परळी, जय भवानी गेवराई. सातारा: किसनवीर खंडाळा, किसनवीर भुईंज. उस्मानाबाद जिल्हा :लोकमंगल माऊली शुगर – लोहारा, कांचेश्वर शुगर – मंगरूळ. सांगली एसजीझेड एसजीए शुगर तासगाव आणि खानापूर युनिट. औरंगाबाद: शरद कारखाना पैठण. लातूर: पन्नगेश्वर शुगर रेणापू , श्री. साईबाबा शुगर औसा. नंदुरबार: सातपुडा तापी शहादा.