कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करत असतील तर ती गोष्ट ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. मात्र, यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. संभाजीराजे यांनी चालढकल केली तर भाजप जो कोणी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी पुढाकार घेईल, त्याच्या पाठिशी उभा राहील, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी चंद्रकांत पाटील यांना संभाजीराजे राज्य सरकारला वेळ देत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, मराठा मोर्चा काढण्यात चालढकल झाली तर ती बाब ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. त्यानंतर मराठा आंदोलनाचं नेतृत्व दुसऱ्या कोणाकडे जाईल किंवा काय होईल, ते माहिती नाही. मात्र, वेळ निघून गेल्यास मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल. संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी तर मिळणार नाही ना, याचा विचार संभाजीराजे यांनी केला पाहिजे.
संभाजीराजे एकदा मोर्चा काढणार, एकदा लाँग मार्च काढणार असे सांगतात. कोल्हापुरातही १६ जूनला मराठा मोर्चा निघणार का, याची अद्याप शाश्वती नाही. तुम्ही या सर्व गोष्टी मराठा समाजासमोर नीटपणे मांडल्या पाहिजेत. संभाजीराजे यांनी रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला मी त्यांना पाठिंबा जाहीर केला. आता त्यांनी माघार घेतली तरी भाजपच्या भूमिकेत फरक पडणार नाही. पण उद्या कोल्हापुरात दुसऱ्या कोणी पुढाकार घेऊन मोर्चा काढला तर भाजप त्यांनाही पाठिंबा देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
Read Also :
- ‘योगी-मोदी हा वाद केवळ केंद्राचे अपयश झाकण्यासाठीच’ – नवाब मलिक
- शरद पवार-प्रशांत किशोर भेट राजकीय नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण
- निवडणुकीच्या राजकारणातील हुकूमी एक्का शरद पवारांच्या भेटीला
- ‘शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा’
- ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पण आम्ही भिकारी आहोत का?’