महाराष्ट्रात स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पवित्र भूमीत पोटनिवडणूक लागली. जर एखादा प्रतिनिधी हा मरण पावला जातो तेव्हा ती निवडणूक ही बिनविरोध होत असते हा राजकारणातील ‘राज धर्म’ आहे मात्र पंढरपूरच्या बाबतीत हा राजधर्म राजकीय पक्षांनी पाळला नाही. भारतीय जनता पक्ष भालके घराण्याच्या विरोधात उमेदवार देण्याबाबत ठाम होता. भारत नाना भालके यांनी विजयसिंह मोहिते पाटील, पंढरपुरातील पांडुरंग परिवारातील प्रशांत परिचारक आणि आताचे उमेदवार समाधान अवताडे या सर्वांना धूळ चारली होती. शरद पवार साहेबांचा एकनिष्ठ सरदार म्हणून ते पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जनतेच्या मनावर राज्य करत होते.
स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसने शिक्का मोर्तब केले. विरोधी पक्षातून कोण उभे राहणार यावर बरेचसे दिवस खलबत चालू होती. अखेरीस संत दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि नितीन गडकरी यांचे अत्यंत विश्वासू समर्थक समाधान अवताडे यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब झाले. अवताडे हे मोठे कॉन्ट्रॅक्टर असल्याने आणि गडकरींनी दबावतंत्र वापरल्यामुळे भारतीय जनता पक्षाला त्यांना उमेदवारी द्यावी लागली. वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी देखील आपले उमेदवार या रणांगणात उतरवले. दिवस ठरले आणि वेळाही ठरल्या, पंढरपूरच्या पावन भूमीवर राजकीय फड रंगू लागले.
पहिल्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाकडून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार प्रशांत परिचारक हे मैदनात उतरले तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संजय मामा शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार हे मैदानात उतरले. समाधान अवताडेंचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी बंडखोरी केली तर महाविकास आघाडीकडून शैला गोडसे यांनी बंडखोरी केली. बंडखोरांना समजून सांगूनही त्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकला चालो रे म्हणत रथ पुढे नेण्यास सुरुवात केली.
भारत नाना भालके हे तीनदा विजयी झालेले होते. त्रिशंकू लढतीचा फायदा घेत ८ हजार ते १० हजार, असे मताधिक्य घेऊन ते निवडून येत असत. मोहिते पाटील आणि पांडुरंग परिवाराचे परिचारक यांनी ही गोष्ट हेरली होती आणि एकत्र येऊन शत्रू संपविण्यासाठी त्यांनी आघाडी केली होती. पंढरपुरात मालक म्हणतील तसंच होणार अशी भावना होती तर मंगळवेढ्यात भूमिपुत्र म्हणवणारे आवताडे चालणार असा देखील एक गट होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र भालकेंना पूर्ण ताकद दिली होती. साम, दाम दंड, भेद, भावनिकता असे सर्वच या निवडणुकीत आजमावले जाणार होते.
प्रचार सभांच्या धडाक्याला सुरुवात झाली आणि भारतीय जनता पक्षाचे शिलेदार रणजितसिंह मोहिते यांना कोरोनाने घेरलं आणि ते इस्पितळात भरती झाले आणि काही अंशी भारतीय जनता पक्ष सुरुवातीलाच थोडा बॅकफूट वर गेला. तसेच राष्ट्रवादीने आपले एक एक मंत्री या निवडणुकीत उतरवन्यास सुरुवात केली. जयंत पाटील, अजित पवार, यांनी मतदार संघ ढवळून काढण्यास सुरुवात केली. अजित पवार यांनी मनसे चा पाठींबा मिळवला. तसेच मोहिते पाटील आणि परिचारक गटाच्या सदस्यांच्या भेटी घेऊन पंढरपुरात राजकीय खळबळ उडवून दिली. त्यासोबतच वंचित चे प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी देखील मतदारसंघात प्रचारसभांचा जोर लावून धरला होता.
अजित दादांची पंढरपुरात एन्ट्री झाली आणि धक्का तंत्राचा वापर करत त्यांनी जेष्ठ नेते कल्याण काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून घेतला. भारतीय जनता पक्षाला मोहितेंच्या दुखण्यानंतरचा हा दुसरा धक्का होता. अजित दादांनी संपूर्ण पंढरपूरचे राजकारण ढवळून काढले. यावेळी भारतीय जनता पक्षाकडून प्रचारासाठी आलेल्या आमदार गोपीचंद पडळकर आणि जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर देखील टीका केली. पाडळकरांनी देखील “अजित पवार हे टगेगिरी करतात आणि बाई सारखे रडतात” असे म्हणत त्यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली.
अजित दादांनी दौरा आटोपता घेतला आणि भारतीय जनता पक्षाने नेत्यांची मोठी रसद पंढरपुरात धाडली. प्रशांत मालक परिचारक आणि रणजितसिंह निंबाळकर यांनी जोर वाढवायला सुरुवात केली. पंढरपुरात जातीचा फॅक्टर हा मोठ्या प्रमाणात चालतो आणि हेच भाजपने हेरले. धनगर समाजचे नेते राम शिंदे, बाळा भेगडे आणि पडळकरांना मैदानात उतरवून त्यांनी बेरजेचे राजकारण केले. पराभूत उमेदवारांची फौज पंढरपुरात आलेली आहे आणि त्यांचा उमेदवार देखील पराभूत हॊणार अशी चर्चा रंगू लागली, मात्र पडळकर आणि शिंदे फॅक्टर किती चालला हे निवडणूक संपल्यानंतर कळले.
भारतीय जनता पक्षाने सुरुवात केल्यावर राष्ट्रवादीने देखील नेत्यांची फौज लागलीच पंढरपुरात धाडली. आमदार सुनील शेळके, रोहित पवार, रुपाली चाकणकर हे नेते पंढरपुरात फिरू लागले आणि सभांचा फड गाजवू लागले. सुनील शेळके आले आणि लागलीच त्यांचे विरोधी संजय बाळा भेगडे यांनी रणांगणातून काढता पाय घेतला. भारतीय जनता पक्षाचे नेते हॉटेलवरच जास्त राहतात अशी टीका शेळकेंनी केली. भारत नाना भालकेंची भावनिक लाट असताना देखील दोन्ही पक्षांनी उतावीळपणा दाखवत मोठे मोठे नेते रणांगणात उतरवले हे महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच बघायला मिळाले.
हळू हळू शेवटचा टप्पा उजाडू लागला आणि आता दिग्ग्ज नेत्यांची मांदियाळी या पंढरपूरच्या रणांगणात दिसू लागली. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, जयंत पाटील, धनंजय मुंडे, गुलाबराव शेळके, सुधीर मुनगंटीवार यांसारखे दिग्ग्ज एकमेकांच्या विरोधात ठाकले. महाराष्ट्राच्या सत्ताकरणाचे परिवर्तन पंढरपूरातून होणार आणि सरकार ही निवडणूक झाल्यावर बदलणार असे देवेंद्र फडणवीस यांनी आत्मविश्वासाने सांगितले तर पवार साहेब नसताना अजित दादा आणि आम्ही मिळून पंढरपुरात करेक्ट कार्यक्रम करणार असा निर्वाळा जयंत पाटील यांनी केला. आमचे आणि परिचारकांचे ठरले आहे असे म्हणत संजय मामा शिंदे यांनी खळबळ उडवून दिली. मात्र परिचारक यांनी आम्ही राष्ट्रवादीला पंढरपुरात रोखणार अशी भीष्मप्रतिज्ञा केली. शरद पवार असताना सुप्रिया सुळे यांनी थेट इस्पितळातून एक सभा घेतली यावरून राष्ट्रवादीने ही निवडणूक किती लावून धरली होती हे सगळ्यांनाच कळले असेल.
शेवटच्या टप्प्यात भावनिक राजकारणाला भालके यांनी हात घातला, तर भूमिपुत्रावर जोर देत निवडून देण्याचे आवताडे यांनी आवाहन केले. सरकारने शेतकऱ्यांची वीज कट केली, बिल माफ नाही केले, विठ्ठल कारखाना मातीत घातला, हे मुद्दे आवताडे यांनी अगदी प्रकर्षाने लावून धरले. जागतिक महामारीत ही निवडणूक पार पडली. पहिल्यांदाच पोटनिवडणुकीत एवढे दिग्ग्ज नेते मैदानात उतरले होते हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहायला मिळाले. समाधान आवताडे यांचा ३ हजार मतांनी विजय झाला. अवताडे यांनी केलेला योग्य प्रचार, परिचारक यांनी निभावलेला शब्द आणि देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेला आता पर्यंतचा सर्वात मोठा जुगार यात फडणवीसांची सरशी झाली तर अजित दादांना आत्मविश्वास नडला, असे म्हणायला हरकत नाही. शैला गोडसे, सिद्धेश्व्रर आवताडे यांना त्यांची जागा योग्य रित्या कळली असेल त्याचप्रमाणे मोठ्या पक्षांच्या गराड्यात स्वाभिमानी आणि वंचितचा ठिकाणा लागला नाही. महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची पंढरपूर ही खरंच नांदी ठरते का?, हे पाहणे आता औत्सुकत्याचे ठरणार आहे हे मात्र नक्की.