नागपूर: ‘भेटी लागे जिवा, लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी’, अशा अनेक ओव्यांमधून भक्त आणि पांडुरंगाच्या दर्शनातील व्याकुळतेचे वर्णन केले आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे घेण्यात येणाऱ्या निर्णयाचे पालन करून विदर्भातील काही संस्थान स्थानिक परिसरातच दिंडी व पालखीचे आयोजन करून पादुकांचे दर्शन भक्तांसाठी उपलब्ध करून देणार आहेत. विदर्भातील बहुसंख्य जिल्हे व सोलापूर जिल्हा सध्या मिशन अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. त्यामुळे विदर्भातील पालखी व दिंड्या यंदा पायी जाणार की गाडीने, हा निर्णय अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.
यावर्षी आषाढी एकादशी २० जुलै रोजी असून पंढरपूर महोत्सव २३ जुलै रोजी (गुरुपौर्णिमा) राहणार आहे. हा महोत्सव याची देही याची डोळा अनुभवण्याकरिता राज्यातील लाखो भाविक दिंडी व पालखीच्या माध्यमातून शेकडो किलोमीटर पायदळ प्रवास करतात व आषाढी एकादशीच्या दोन-तीन दिवसांअगोदर पंढरपुरात पोहोचतात. दरवर्षी पायदळ वारी करणारे असंख्य वारकरी आपल्या दिंडीच्या आयोजकांकडे दिंडी संदर्भात विचारपूस करीत आहेत. विदर्भातील बहुसंख्य दिंड्या या आषाढी एकादशीच्या एक ते दीड महिन्याअगोदर निघत असल्याने त्याला आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे.
क्षेत्र कौंडिण्यपूर येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी संस्थानच्या पालखीची परंपरा ४२६ वर्षांची आहे. मागील वर्षी ऐन वेळी ९ मानाच्या पालख्यांना परवानगी मिळाली होती. यावर्षीसुद्धा सध्याची परिस्थिती बघता १४ जूनला संस्थान परिसरात पालखी प्रदक्षिणा करून सभागृहात पालखी व पादुका दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार पंढरपूरला जाण्याचा निर्णय वेळेनुसार घेण्यात येईल, असे संस्थानचे सचिव सदानंद साधू यांनी सांगितले.