नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन कोरोना परिस्थिती बद्दल माहिती दिली होती यावेळी त्यांनी “वेळ आली तर मी फक्त लॉकडाऊन करणार नाही, सोबत कर्फ्यू लावेन”, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला होता.
या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये लॉकडाऊनबाबत महापौरांनी बोलावलेली बैठक संपली. या बैठकीत नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे दोघेही उपस्थित होते. यावेळी कोरोना नियंत्रणासाठी नागपूरमध्ये दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील 4 दिवस लोकप्रतिनिधी रस्त्यावर येतील असंही निश्चित करण्यात आलं.
महापौर आणि आयुक्तांनी आज लॉकडाऊनबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. महापौर संदीप जोशी म्हणाले, “बैठकीत सर्व जनप्रतिनिधींचं मत आम्ही जाणून घेतलं. लॉकडाऊन केलं पाहिजे यासाठी कुणाचाही आग्रह नाही. पण नियम पाळले जात नाहीत. त्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचं आहे. 25 जुलै आणि 26 जुलै नागपुरात जनता कर्फ्यू लागू करण्यात येईल. 27 जुलै ते 30 जुलै या हे 4 दिवसांमध्ये नागपुरात लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरुन लोकांना आवाहन करणार आहेत.”
तुकाराम मुंढे म्हणाले, “अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व दुकानं उद्या-परवा बंद ठेवावीत. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी बाहेर पडू नये. नागरिकांनी नियम पाळले, तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही. नियम पाळले नाही, तर लॉकडाऊनची वेळ येईल. तेव्हा कर्फ्यू देखील असेल. लोकांनी किमान आपल्या जीवासाठी तरी नियमांचं पालन करावं.”