राज्याचे मंत्री आणि भाजप आमदार अतुल सावे यांनी ‘आमच्याकडे २३७ आमदार आहेत, ज्यांना युतीत राहायचं नसेल, त्यांनी बाहेर पडावं’ असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या विधानावर शिवसेना आमदार बाबूराव कदम यांनी रोखठोक प्रतिक्रीया देत सावेंना थेट सवाल केला आहे.
२३७ आकड्याचा माज न करण्याचा इशारा : बाबूराव कदम म्हणाले, “२३७ चा आकडा कोणी गाठला आणि कशामुळे गाठला, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कोणाच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या गेल्या आणि युतीला यश मिळालं, हे विसरू नये. २३७ आमदारांचा माज दाखवण्याची कोणालाही गरज नाही.”
अधिकार सावे यांना अधिकार कोणी दिला? : कदम पुढे म्हणाले, “सत्तेत कोणी राहायचं आणि कोणी बाहेर पडायचं, याचा अधिकार सावे साहेबांनी स्वतःकडे घेतला कुठून? हे ठरवण्याचं काम जनतेचं आणि पक्षश्रेष्ठींचं असतं. असा माज जनतेसमोर चालत नाही.”
नांदेडमधील तक्रारी आणि निधी वाटपावरून नाराजी : नांदेड जिल्ह्यातील सहा आणि हिंगोलीच्या तीन आमदारांनी सावेंच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याची माहितीही यावेळी बाबूराव कदम यांनी दिली. तांडा वस्तीच्या निधी वाटपात अनियमितता झाली असून, त्यावर स्टे का द्यावा लागला, याचा हिशोब देण्याची गरज असल्याचही ते म्हणाले. सावे साहेबांनी आधी आत्मपरीक्षण करावं. जनतेमध्ये जाऊन विचारावं की २३७ आमदार मिळवण्यामागे कोणाचा चेहरा होता. सत्ता टिकवायची असेल, तर अशा बेताल वक्तव्यांवर लगाम घालावा लागेल.” असं तिखट उत्तर त्यांनी दिलं .