राज्याच्या शिक्षण विभागाने आता १ ली ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संकटकाळात विद्यार्थ्यांवरील ताण काहीसा कमी होणार आहे.
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालये सध्या बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारच्या घोषणेनुसार १५ जूनपासून ऑनलाईन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षणात काही मर्यादा आहेत. अभ्यासक्रम पूर्ण होणे हे आव्हानात्मक आहे. त्यामुळे, राज्य सरकारने अभ्यासक्रमात कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.