कोरोनाच्या काळात सेवा करताना मुंबईत भाजपचे ३० कार्यकर्ते कोरोनामुळे मृत्यू पावले, असा दावा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केला. धारावी झोपडपट्टीत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. त्यात लोढा यांनी उडी घेत भाजप कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेने काम केल्याचे सांगितले.
मुंबईत संघाच्या स्वयंसेवकांनी जवळपास एक लाख २२ हजार नागरिकांचे स्क्रिनिंग पूर्ण केले आहे. या संस्थांच्या कामाचे श्रेय त्यांना मिळालेच पाहिजे, असेही लोढा यांनी म्हटले आहे. धारावी कोरोनामुक्त करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचा वाटा आहे का, या वादात मंगलप्रभात लोढा यांनीही संघाची बाजू घेतली असून दुसऱ्याचे श्रेय लपवणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही, अशी आठवण त्यांनी करून दिली.
राज्य कोरोनाच्या विळख्यात असताना दाट लोकवस्तीची धारावी कोरोनामुक्त करणे हे सोपे काम नव्हते. या कामात अनेक सामाजिक, धार्मिक संस्थांची मदत झाली आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरातच या कोरोना संकटात ‘आरएसएस’ सर्व शक्तिनिशी मदत कार्य करत आहे. ही मंडळी कधीही श्रेयासाठी काम करत नाहीत, असे लोढा म्हणाले आहेत.