कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. यूजीसीने विद्यापीठांना परीक्षा घेण्याबाबत निर्देश दिल्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
युवा सेनेच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत यूजीसीच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. मात्र, या याचिकेनंतर यूजीसीनं प्रसिद्धीपत्रक जारी करत देशातील 755 पैकी 560 विद्यापीठं परीक्षा घेण्यास तयार असल्याचा दावा केला आहे.
यूजीसीने या पत्रकात म्हटलं आहे, “नुकतेच विद्यापीठांना परीक्षा घेणं शक्य आहे की नाही याची माहिती देण्यास सांगण्यात आलं होतं. 945 विद्यापीठांपैकी 755 विद्यापीठांनी यावर प्रतिसाद दिला आहे. यापैकी 560 विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या आहेत किंवा परीक्षा घेण्याचं नियोजन केलं आहे. यातील 194 विद्यापीठांनी आधीच परीक्षा घेतल्या आहेत. तर 366 विद्यापीठांनी ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली आहे.”