मुंबई : राज्यात करोनामुळे हाहाकार उडाला असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन लावावा की नाही, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी व टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर, आता राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनीच असे संकेत दिले आहेत.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री आज लॉकडाऊन संदर्भातील घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचं ठाम मत उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केलं होतं. त्यामुळे राज्यात ८ किंवा १४ दिवसांचा कडक लॉकडाऊनचे संकेतच मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले होते. त्यानंतर कोविड टास्कफोर्स सोबतच्या बैठकीतही कडक लॉकडाऊन करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं.
राज्यात लागू करण्यात येणारा लॉकडाऊन नेमका कसा असेल? किती दिवसांचा असेल? नवी नियमावली काय असेल? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज साडेआठ वाजता काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray to address the state at 8.30 pm today.
(File photo) pic.twitter.com/1pDiz1hEFz
— ANI (@ANI) April 13, 2021