प्रतिनिधी / ओंकार गोरे
राज्याच्या राजकारणातील २ मोठी नावं शरद पवार आणि गोपिनाथ मुंडे यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच १२ डिसेंबरला येतो. योगायोगाने स्वभाव, कार्यशैली, राजकारणाची पद्धत सगळंच भिन्न असणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे २२ जुलै रोजी येतो. सध्या मात्र राज्याचे शकट हाकण्यात या दोघांची महत्त्वाची भूमिका आहे.
शरद पवार आणि गोपिनाथ मुंडे हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी होते, गोपिनाथ मुंडे हे अनेकदा शरद पवार यांच्यावर जहरी टीका करायचे. त्यांच्यातल्या या राजकीय स्पर्धेचं रूपांतर काहीअंशी वैरामध्ये झालेलं सुद्धा दिसून आलं आहे. पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय स्पर्धा आहे का? की दोघांमध्ये राजकीय वैर आहे की मैत्री? की पहाटेच्या शपथविधीनंतर दोघांचं नातं it’s complicated पर्यंत आलंय?, या दोन्ही नेत्यांच्या नात्यात काही महत्त्वाचे टप्पे आले, जेव्हा ते एकमेकांच्या समोरासमोर उभे ठाकले गेले, कधी एकमेकांना साथ दिली तर कधी एकमेकांपासून दूर गेले.
नगरसेवक ते मुख्यमंत्री
देवेंद्र यांनाही घरातून राजकारणाचा वारसा होता. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे विधान परिषदेचे आमदार होते तर त्यांच्या काकू शोभा फडणवीस यासुद्धा आमदार होत्या. नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणलं. १९९२ साली ते नागपूरच्या राम नगर प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर पाचच वर्षात ते नागपूरचे सर्वांत तरुण महापौर बनले. १९९९ पासून ते विधानसभेवर निवडून येत आहेत. अजित पवार सत्तेत असताना फडणवीस हे विरोधकांचा आक्रमक आवाज होते. अभ्यासू नेता अशी त्यांची प्रतिमा होती.महाराष्ट्रात भाजपमध्ये गडकरी-मुंडे असे गट पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपनं २०१४ साली विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी पक्षश्रेष्ठींची पहिली पसंती फडणवीसच ठरले. फडणवीस यांचं वैशिष्ट्य म्हणजे १९९९ पासून ते आमदार म्हणून निवडून येत आहेत, मात्र ते कधीच मंत्री झाले नाहीत. कोणत्याही मंत्रिपदावर काम न करता ते थेट मुख्यमंत्रीच बनले.
घरातच राजकीय वारसा, काकांकडून प्रेरणा
काका शरद पवार यांच्याकडून अजित पवारांना राजकीय वारसा मिळाला होताच. १९८२ साली सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीपासून अजित पवारांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. अजित पवारांनी पहिली निवडणूक विधानसभेची नाही तर लोकसभेची लढवली होती. १९९१ मध्ये ते बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. मात्र त्यांची लोकसभेतील ही कारकीर्द सहा-आठ महिन्यांचीच ठरली.मात्र तेव्हापासून अजित पवार राज्यात कार्यरत राहिले तर २००९ पासून शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या लोकसभेत बारामतीचं प्रतिनिधित्व करतात. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे ही राष्ट्रवादी काँग्रेसची जणू अलिखित विभागणीच झाली आहे. १९९५ पासून अजित पवार विधानसभेत बारामती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. सुधाकरराव नाईकांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत, आघाडीच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी मंत्रिपद भूषवले आहे.
राज्यात पहाटेचा राजकीय भूकंप
गेल्या विधासभेच्या निवडणुकीत राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना या दोघांनी महाराष्ट्रात राजकीय भूकंप आणले होते. प्रत्येकाला ती सकाळ आठवते ज्या दिवशी अचानक पणे हे दोघे एकत्र आले. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाशी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यानच्या काळात यामागे शरद पवारांचा हात असल्याचे देखिल मानले जात आहे. एकत्र शपथ घेतलेल्या फडणवीस-पवारांच्या बाबतीत एक वेगळाच योगायोग पाहायला मिळाला. एकाच दिवशी वाढदिवस असलेल्या दोघांनी एकाच दिवशी शपथ घेतली, तर एकाच दिवशी राजीनामा देण्याची नामुष्की आली आहे.
पहाटेची शपतविधी ही मोठी चुक…
२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधी सोहळा चांगलाच गाजला होता. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या ८० तासांच्या सरकारची आजही चर्चा होते. या शपथविधीवर तब्बल दीड वर्षांनी देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं. मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवार यांच्यासोबत भल्या पहाटे शपथ घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय हा चुकीचा होता. पण त्याचा आता पश्चाताप होत नाही, असं म्हणत फडणवीस यांनी ज्यावेळी पाठीत खंजीर खुपसला जातो. तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं आणि तुम्ही राजकारणात मेलात तर तुम्हाला उत्तर देणं शक्य नाही, असे सांगत फडणवीसांनी खंत व्यक्त केली.
सत्ता कोणाचीही असो उपमुख्यमंत्री मीच
२०१९ ला भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद झाले झाले. त्यानंतर अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. भल्या पहाटे हा शपथविधी सोहळा झाला होता. त्यानंतर राज्यातल्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली. पण पाठिंब्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे हे सरकार अवघ्या ८० तासांतच गडगडलं.
त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात राज्यात महाविकास आघाडी (शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस) ची सत्ता स्थापन झाली. विशेषत: म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले असताना त्यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यानंतर ८० तासाच कोसळलेल्या सरकारनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्येही अजितदादांची उपमुख्यमंत्रीपदीच वर्णी लागली. त्यामुळे सरकार कोणाचेही असो उपमुख्यमंत्री मीच अशी अवस्था दादांची झाली.
पवार आणि फडणवीसांचे पुण्यातील योगदान किती?
सत्ताधारी आणि विरोधक म्हणून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा संघर्ष जसा सभागृहात सुरू आहे, तसाच तो पुण्यातही सुरू आहे आणि तो म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून. कारण वाढदिवस साजरा करून नका असे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांकडून आदेश देण्यात आले असतानाच आपला नेता किती पावरफुल आहे हे दाखवण्याच्या नादात चक्क पुण्याचे शिल्पकारच घोषीत केले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते हे देवेंद्र फडणवीस कधीपासून पुण्याचे विकासाचे शिल्पकार झाले असा प्रश्न विचारत आहेत तर भाजपकडून शहरातले मेट्रो पासून जायका पर्यंतचे सगळे प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून आले असल्याचा दावा करतात. गेले पंधरा ते वीस वर्ष पुण्याच्या राजकारणावर अजित पवार यांची एक हाती पकड होती. मात्र राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पंधरा वर्षांनंतर पुण्याला नवा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या स्वरूपात मिळाला. सहाजिक त्यांच्या कामाचा वेग उरक या सगळ्या गोष्टींची बरोबरी अजित पवार यांच्या कामाचे स्टाईलचे केली गेली आणि उत्तर अपेक्षेप्रमाणे नकारात्मकच येत होतं.
राज्य सरकार भाजपच असताना देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या २४ तास पाणीपुरवठा पासून मेट्रोपर्यंत सगळ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये वैयक्तिक लक्ष घातलेलं होतं. मात्र आजवर यातला एकही प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. आता अजित पवार यांनी पुन्हा पुण्याच्या पालकमंत्रिपदाचे सूत्र हातात घेतल्यानंतर वैयक्तिक स्तरावर लक्ष घालून त्यांनी महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही मोठ्या प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुण्याचा कारभारी म्हणून त्यांची ओळख आहे खरी पण आता महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपने देवेंद्र फडणवीस यांना पुण्याच्या विकासाचा शिल्पकार असा ब्रँड तयार करून राजकीय आव्हान दिले.
दोघे पुन्हा एकत्र येतील का?
राजकारणात कधी काय घडू शकतं हे आपण सांगू शकत नाही, पण शरद पवार राजकारणात सक्रिय असेपर्यंत दोघं एकत्र येण्याची शक्यता कमी आहे, असं अभ्यासकांना वाटतं. “भविष्यातला संवादाचा प्रवाह खुला ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांकडून होताना दिसतो. दोघांमध्ये आतून अंडरस्टँडिंग आहे असं मला वाटतं. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना दिसत नाहीत. पण दोन्ही नेत्यांचा स्वभाव आक्रमक आहे, दोघांना स्वंतंत्र निर्णय घेण्याची सवय आहे, त्यामुळे ते पुन्हा एकत्र जरी आले तरी दोघांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता मला जास्त वाटते,” असंही मत एका राजकीय अभ्यासकाने वर्तवले आहे.
…अश्या या दोन दमदार मंत्र्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!