रायगड : अदिती चांगलं काम करत आहे, ती कमी पडली की तिचा बाप म्हणजेच राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे माझ्या डोक्यावर येऊन बसतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण राज्यमंत्री अदिती तटकरे यांचं कौतुक केलं. अजित पवार आज रायगड-श्रीवर्धन दौऱ्यावर आहेत.
अदिती माझी मुलगी, पै पै कामासाठी खर्च झाले पाहिजे, ब्रिटिशांचं काम टिकतं आपलं का टिकत नाही, असा सवालही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. अदिती तू मला बोलवलंस, पण काम चांगलं झालं पाहिजे, नाहीतर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही, हे आधीच सांगून ठेवतोय. मी स्पष्ट बोलतो, असं अजित पवार म्हणाले.
पाच वर्षात चार वादळं आली. सरकार पाठिशी आहे, केंद्र सरकारचे नियम लहान असतील तरी साडेतीनपट पैसे देण्याचं काम राज्याने केलं. कोरोना कसा अटॅक करेल सांगता येत नाही. नियम ठरवून दिल्याप्रमाणे पालन करण्याचं आपलं काम आहे. आतताईपणा जीवावर बेततोय. कुणालाही वाटलं नव्हतं की महाविकासआघाडीची स्थापना होईल आणि आपलं सरकार येईल. पण कामाला सुरुवात करताच कोरोनाने प्रवेश केला. १४ महिने झाले राज्याच्या तिजोरीत येणारा पैसा कमी झाला, असं त्यांनी नमूद केलं.
शरद पवारांनी अनेक हल्ले, वादळं, दुष्काळ, गारपीट पाहिली, पण त्यातून न डगमगता राज्यातील जनतेला उभं करण्याचं काम केलं. ही भूमी ऐतिहासिक आहे. या भूमीला छत्रपतींचा वारसा आहे, महाडचं चवदार तळंही इथेच आहे. सी डी देशमुख, कान्होजी आंग्रेंचा इतिहास. त्यामुळे इथे आल्याचा आनंद आहे, रायगडावर सुवर्णतुला ४ जूनला झाली, आजचा दिवस महत्वाचा. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, असं अजित पवार म्हणाले.
Read Also :