पुणे : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर रामदास कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. तसेच, मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा नटी, बाई असा उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सरकारमध्ये वाचाळविरांची संख्या वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचाळवीरांना आवरावं. सरकारमधील मंत्र्यांची वागणूक चुकीची आहे. सरकार बदनाम होत आहे, अशा शब्दात अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.
दिवाळीपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेगवेगळी भेट घेऊन त्यांना इशारा दिला होता. तुमच्या सरकारमध्ये वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलंय. यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय, लक्ष ठेवा, असं समजावलं होतं. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तणावाखाली काम करतायत. मंत्रीपदावरील व्यक्ती काहीही बोलून नंतर मी सहज बोललो असं म्हणतायत..पण सहज बोलायला तुम्ही सामन्य नाहीत. मंत्री पदावर आहात, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे.