पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्येक शनिवारी आढावा बैठक घेत आहेत. उपाययोजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. असं असताना रुग्ण संख्या वाढण्याबरोबरच रुग्णांना उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यामध्ये सुधारणा करण्याची तंबी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.
कोरोना विरोधातील उपाय योजनांच्या बाबतीत मात्र पुण्याला मुंबईचा आदर्श घ्यावा लागणार आहे. असे पवार यांनी बैठकीत सांगितले होते त्यांनी थेट मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह यांना पुण्यात पाचारण केले आणि इथल्या अधिकाऱ्यांना त्यांच्यामार्फत कोरोना नियंत्रणाचे धडे दिले.
कोरोना नियंत्रणाच्या मुंबईतील अनुभवाच्या आधारावर इक्बाल सिंह चहल यांनी पुणे प्रशासनाला या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पुण्यात बैठक घेतली. शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पुण्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या पन्नास हजारांवर गेली आहे.