महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येण्याआधी नेहरू सेंटरवर झालेल्या बैठकीत खातेवाटपावरून चाललेला गोंधळ पाहून अजित पवार नाराज होते. अशी रस्सीखेच असेल तर हे सरकार टिकणार कसे ? अशी शंका त्यांना होती, त्यामुळेच ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी केला. अजितदादांनी भाजपसोबत जायला नको होते, असेही ते म्हणाले.
हे सरकार स्थापन करतेवेळी ‘जे घडले’ व त्यानंतर आमचा जो काही संवाद झाला, त्यांनी जी भावना व्यक्त केली ते सगळं आत्ता उघड करता येणार नाही. पण पुढे सगळे प्रश्न सुटले आणि आता तर आमचे सरकार व्यवस्थीत चालू आहे, असे खा. पटेल म्हणाले. तीन पक्षांची एक समन्वय समिती आहे त्यामुळे आतापर्यंत कोणताही मोठा वाद निर्माण झाला नसल्याचेही पटेल यावेळी म्हणाले.
सुशांत सिंह प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव यावरही केले भाष्य
हे सगळे ‘रीड बिट्वीन द लाईन्स’ आहे. आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणात काहीही संबंध नाही. आदित्य कधी त्या सुशांत सिंग राजपूतच्या घरी गेला होता ? भेटीगाठीचे संबंध तरी होते का, तर तसे काहीही नव्हते. आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करणे दुर्देवी आहे.
पार्थ पवारच्या यांच्या भूमिकेवरही केले भाष्य
पार्थ जरी अजित पवार यांचा मुलगा असला तरी राष्ट्रवादीत पार्थची काहीही भूमिका नाही. विनाकारण त्यांना एवढे महत्त्व देऊन, त्याच्या ट्विटला महत्त्व देणे मला आवश्यक वाटत नाही. तरुण मुले ट्विटरवर व फेसबुकवर काहीही बोलतात. आमच्यादृष्टीने पार्थ प्रकरणावर पडदा पडला आहे.