मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केल्यामुळे अखेर हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पण, अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असला तरी न्यायालयीन लढाईसाठी आता मैदानात उतरले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख हे संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहे. आज रात्री उशिरा अनिल देशमुख हे दिल्लीत पोहचणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे. हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनिल देशमुख यांनी ज्येष्ठ वकिलांचा सल्लाही घेण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले. देशमुखांकडून निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंकडे शंभर कोटी वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर अॅड. जयश्री पाटील यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने या प्रकरणाची सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले. याबाबतचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली.