वसई विरार महापालिकेला तीन महिन्यांनी पूर्ण वेळ आयुक्त मिळाले होते. धुळ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी असलेल्या डी. गंगाथरन यांची एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मार्च महिन्यात धुळे जिल्ह्यातील निवडणुकीमुळे गंगाथरन यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली होती.
वसई विरार महापालिकेचे आयुक्त बी.जी. पवार डिसेंबर २०१९ मध्येच सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर पूर्णवेळ आयुक्त मिळाले नव्हते. अखेर ७ एप्रिल २०२० रोजी मुख्यमंत्र्यानी तातडीने वसई-विरार महापालिकेचे रिक्त असलेले आयुक्तपद भरण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा डी गंगाथरन यांची नियुक्ती केली.
डी गंगाथरन यांनी वसई विरार महापालिकेचा कारभार स्वीकराला तेव्हा कोरोनासारख्या महामारीचा प्रकोप सर्वत्र वाढत चालला होता आणि आजही तो वसई विरार मध्ये सुरूच आहे. मात्र डी गंगाथरन राज्यातील सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधींना ते भेटतात, मात्र इतर पक्षातील प्रतिनिधींना ते अजिबात जुमानत नाहीत असा सर्वच विरोधी पक्षातील प्रतिनिधींचा अनुभव आहे. सत्ताधाऱ्यांच्या प्रतिनिधींना खुश ठेवण्यावर त्यांचा अधिक भर असतो. सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी १२-१५ जण एकत्र आल्यास देखील ते विनाअट भेट देतात. मात्र कोरोना संबंधित विषयाला अनुसरून विरोधी पक्षातील प्रतिनिधी काही अडचणी घेऊन आल्यास भेटताना अटी घालतात आणि बोलण्यात उर्मटपणा दाखवतात हाच अनुभव झाला आहे.
काल आज मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव त्यांच्या स्थानिक ७-८ प्रतिनिधींना घेऊन गेले असता तोच प्रकार घडला. काही वेळापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी घोळक्याने भेट घेऊन गेलेले असताना, मनसेच्या केवळ दोनच लोकांना आत पाठवा अशी अट घातली, अन्यथा भेट देणार नाही असा संदेश पाठवला.
स्थानिक कोविड सेंटरमध्ये सुविधाच उपलब्ध नसल्याने रुग्णांचे अत्यंत हाल होत आहेत. त्यासाठी स्थानिक मनसे प्रतिनिधींनी फोटो पुराव्यांसहित आयुक्तांची भेट घेण्यास गेले, जेणे करून रुग्णांचे प्रश्न मांडता येतील आणि त्यांना प्राथमिक सेवा उपलब्ध होतील. मात्र आयुक्तांना स्वतःच्या क्षेत्रातील कोविड सेंटरमधील दुरावस्थतेचे पुरावे आणल्याने राग आल्याचं पाहायला मिळालं. परिणामी त्यांनी भेट देणं टाळलं आणि भेटायचं तर दोघांनीच या असं ठणकावलं. त्यामुळे अविनाश जाधव संतापले आणि आयुक्तालयातच कोविड सेंटरच्या दुरावस्थतेचे फोटो लावले. मात्र ते फोटो लावत असताना देखील आयुक्त आतून अविनाश जाधव यांना दमबाजी करत होते, पण त्यांचा उर्मटपणा ते कॅबिनमध्ये असल्याने कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला नाही. त्यामुळे आयुक्तांना ना लोक प्रतिनिधींशी संवाद साधायचा आहे, ना कोरोना सेंटरमधील दुरावस्थेला समजून घ्यायचं आहे असंच चित्र आहे.