विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. सध्या राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आहे. मात्र या सरकारमध्ये सध्या मतभेद होताना दिसत आहेत
पारनेरचा मुद्दा तसेच पोलीस आयुक्ताच्या बदल्या यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये मतभेद झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थी करून हे मतभेद सोडवले तर दुसरीकडे महविकासाआघाडी सरकारमध्ये सतत काँग्रेसला दुय्य्म स्थान दिले जात असल्याचे अनेक प्रत्यय समोर आले. त्यामुळे महविकासआघाडीमध्ये सततच्या कुरबुरी पाहायला मिळत आहेत.
महाविकासआघाडीमधील या कुरबुरींबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आले. बाळासाहेब थोरात यांनी यावर आपले मत मांडले आहे. “आमच्यात जरी मतभेद असले तरी आम्ही सगळे निर्णय एकत्र घेऊ आणि एकत्र काम करू “असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले तसेच “आमचे तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे मीडियाचे आमच्याकडे जास्त लक्ष आहे” असा टोला बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांना लगावला