मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने नोटीस बजावली. त्यानंतर राऊतांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर तुफान हल्ले चढवले. तसंच आजच्या सामना अग्रलेखातून त्यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. राऊतांनी केलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली. भाजपनेही राऊतांना जशास तसं उत्तर दिलंय. ईडीची नोटीस आल्यानंतर राऊत बिथरलेत, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज असल्याची बोचरी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली
“संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यापासून संजय राऊत ज्याप्रकारे लिहित आहेत किंबहुना वक्तव्यं करत आहे त्यावरुन ते बिथरल्याचं दिसत आहेत. त्यांना तात्काळ मानसोपचार तज्ज्ञाला दाखवण्याची गरज आहे”, अशी टीका शेलार यांनी केलीय.
“संजय राऊतसाहेबांना माझा मैत्रीचा सल्ला असेल की त्यांनी लवकरात लवकर एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार करुन घ्यावेत म्हणजे ते ठीक होतील”, असं म्हणत शेलारांनी राऊतांवर शरसंधान साधलं. राऊतांची गेल्या काही दिवसांपासूनची विधाने पाहता त्यांना भाजपद्वेषाने पछाडलंय, असं शेलार म्हणाले.
ज्या पद्धतीची भाषा शिवसेना आणि सामनाच्या अग्रलेखातून वापरली जातेय त्याची किव येते. बहुतेक मा. संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. pic.twitter.com/nb4tDeLhMa
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 30, 2020