मुंबई : मराठा आरक्षणावरून शिवसंग्रामचे विनायक मेटे आक्रमक झाल्याचे पाह्यला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा कायदा रद्दबादल केल्यानंतर, एकीकडे राज्यात सत्ताधरी आणि विरोधक केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मात्र, विनायक मेटे यांनी थेट एल्गार पुकारला असून, मोर्चे आणि आंदोलन होऊ नये, यासाठी राज्यातला लॉकडाऊन राज्य वाढला असला, तरी ५ जूनला मोर्चा काढणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, “१०२ व्या घटना दुरुस्तीसाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. याबद्दल अशोक चव्हाणांनी केंद्राचे आभार मानले पाहिजेत, असे म्हटले आहे. तसेच, आघाडी सरकारच्या मनात पाप असल्याची खरमरीत टीका मेटे यांनी केली आहे. तसेच, ठाकरे सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. हे सरकार नतद्रष्ट सरकार असून, या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नसल्याची जळजळीत टीका देखील मेटे यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी, ८ मे रोजी राज्यभरातील तहसीलदारांना निवेदन देणार असून, पुन्हा मोर्चा काढण्यात येईल. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. आम्ही मंत्र्यांना फिरू देणार नाही, त्यांच्या गाड्या अडवणार. महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. जरी राज्यात लॉकडाऊन मराठा समाजाच्या मुस्कटदाबीसाठी वाढवला असला, तरी जूनच्या ५ तारखेच्या आसपास मोर्चा काढणारच, असा इशाराच विनायक मेटे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर देखील निशाणा साधत, अशोक चव्हाण यांच्या तातडीने राजीनाम्याची मागणी केली होती. यावेळी देखील त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना, अशोक चव्हाण यांची याबाबतीत “नाचता येईना अंगण वाकडे” अशी भूमिका दिसत आहे. सगळं केंद्रच करणार, मग तुम्ही काय करणार? अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
Read Also :