जळगाव: राज्यातील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या मध्ये बिघाड झाल्यानंतर, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार केल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात वातावरण चांगलचे तापलेले आहे. दोन्ही पक्ष एकमेंकावर टिका करण्याची एक संधी सोडत नाही. त्याच दरम्यान आता शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
जळगाव दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हटलं, “राजकारणात काहीही घडू शकतं, राजकारण फार चंचल असतं, कधी काय होईल सांगू शकत नाही. शिवसेनेचं भाग्य आहे. गेल्या पाच वर्षात सत्तेत असून सुद्धा शिवसेना संपवण्याचे प्रयत्न झाले. की आपण जणू गुलामच होतो. दुय्यम स्थान दिलं जात होतं. आपली अवस्था खूप वाईट होती. मला सदैव असं वाटायचं की या राज्याला मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असावा.”
संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यामाशी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “मला वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना अत्यंत सन्मानाने उद्धवजी असतील आणि इतर असतील यांना वागणूक दिली असं शिवसेनेतील मंत्री सांगतील. परंतू आज मुख्यमंत्री शिवसेनेचा असतानाही ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या मागे फरफट होतेय याला राऊत साहेब नेमकं काय म्हणणार आहेत याचं उत्तरही त्यांनी द्यावं”.
हा शिवसेनेच्या विचाराचा अवमान आहे. शिवसैनिक किंवा शिवसेनेचा कोणताही नेता अशा प्रकारे गुलाम होईल यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना प्रत्येक मंत्र्याला अतिशय प्रेमाची, सन्मानाची वागणूक द्यायचे अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.