माढा: सोलापुरात उजनीच्या पाण्यावरून राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्याबाबत सरकारकडून आदेश काढण्यात आला होता. त्यावरून जिल्हातील आमदार, खासदार, शेतकरी संघटना, सामाजिक संघटना यांनी आंदोलनाचे इशारे दिले त्यामुळे जनक्रोशाचा अंदाज घेत उजनीच्या पाण्याचा आदेश रद्द करण्यात आला. विरोधी पक्षच नव्हे तर महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी देखील उजनीच्या पाण्याच्या बाबतीत सरकार विरोधी भूमिका घेतली आहे.
सध्याची वेळ ही काही राजकारण करण्याची नाही तर आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या अस्मितेसाठी राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेऊन सर्वानी एकत्रित येण्याची गरज आहे. उजनी धरणाच्या पाण्याचे संपूर्ण वाटप झालेले आहे त्यामुळे इंदापूर तालुक्याला पाणी देण्याचा प्रश्नच उरत नाही. सदरील आदेश रद्द करण्याचा आदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यापूर्वीच दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे ते याबाबत लवकरच सुधारित आदेश देतील असा विश्वास आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
आमदार बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादीचे सर्वात जेष्ठ नेते आहेत. उजनी धरणातून इंदापूरला पाणी देण्याचा आदेश रद्द होईल, आदेश जर रद्द झाला नाही तर मी सोलापूर जिल्ह्याच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेल अशी भूमिका आमदार बबनदादा शिंदे यांनी घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघातून आमदार बबनदादा शिंदे हे तब्ब्ल सहा वेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी झालेले आहेत. सोलापूर जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उजनीच्या पाण्यावरून आमदारकीचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. यात आमदार यशवंत माने,आमदार बबनदादा शिंदे यांचा समावेश आहे.