वादग्रस्त बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांची साक्ष आज नोंदविण्यात आली. सीबीआयच्या विशेष कोर्टात त्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपला जबाब नोंदवला. या प्रकरणात केवळ राजकीय हेतूने आपल्याला गोवण्यात आलं आहे. तत्कालीन केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरूनच हे काम करण्यात आलं असून आपण निर्दोष आहोत असंही त्यांनी सांगितलं.
गेली अनेक वर्ष या खटल्याचं कामकाज सुरू आहे. आता राम मंदिराच्या खटल्याचा निकाल लागून त्यावर 5 ऑगस्टला मंदिराचं कामकाजही सुरु होणार असून हा खटला मात्र अनेक वर्ष रेंगाळला आहे. येत्या 5 ऑगस्टला मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या हस्ते होणार आहे. ‘राम मंदिर निर्माण तीर्थ ट्रस्ट’ची बैठक झाली आणि त्यात पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आलं. पंतप्रधानांनी ते निमंत्रण स्वीकारलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संदर्भातला आढावा घ्यायलाही सुरुवात केली आहे.