मुंबई: कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. तो कोणत्याही रूपाने मानवी शरीरात प्रवेश करतो. दुसऱया लाटेनंतर लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाले असले तरी, अजून पुर्णपणे कोरोना सपलेला नाही. कोणीही निष्काळजीपणा करू नका, कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
अमृतवाहिनी इंजिनीअरिंग कॉलेज अहमदनगर येथे तालुका व शहरातील कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.
महसूलमंत्री थोरात म्हणाले, संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून, कोरोनाची रुग्णवाढ कमी आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर होणारी गर्दी चिंताजनक आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. काही तज्ञांच्या मते तिसरी लाट येऊ शकते म्हणून प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन केले पाहिजे. लक्षणे असणाऱयांचे विलगीकरण करा. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करून जास्तीत जास्त गावे कोरोनामुक्त करण्यासाठी सहभाग घेतला पाहिजे. संगमनेर तालुक्यात सध्या 81 गावे कोरोनामुक्त झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाच पातळ्या म्हणजे जणू कोरोनाची पूर रेषा
मुख्यमंत्री म्हणाले, दुसऱ्या लाटेचा मुकाबला करताना रुग्ण संख्या कमी करण्यात आपल्याला यश येत असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पावसाळ्यात आपापल्या भागातील नदी व धरणातील पाणी साठ्यावर लक्ष ठेवून असतो व विशिष्ट रेषेच्या वर पाणी पातळी वाढली तर लगेचच नागरिकांचे स्थलांतर किंवा इतर पाउले उचलतो अगदी त्याचप्रमाणे कोरोनासाठी निर्बंध लावायचे किंवा नाही याकरिता या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत.
शंका असेल तर निर्बंध सुरूच ठेवा
कोरोना रुग्णाच्या संख्येत चढ उतार होत असतात. आपण लेव्हल्स ठरविल्या असल्या तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला , कुठल्याही दबावाला बळी पडू नका असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनाना दिला आहे.