नवी दिल्ली : देशात महामारीचा फैलाव आणि प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे देशभरात महामारीच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असून, अशा परिस्थितीही देशात आयपीएलच्या सामन्यांचे नियोजन केल्याने देशभरातून केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला जात होता.
मात्र, आयपीएल स्पर्धा ही सुरक्षित वातावरणात खेळवली जात असून, त्यामुळे आयपीएलमध्ये महामारीचा शिरकाव होणार नाही, असे आयपीएल स्पर्धांचे नियोजन करणाऱ्या बीसीसीआयकडून सांगितले जात होते.
दरम्यान, आता आयपीएललाही महामारीने गाठले असून, त्यामुळे कालचा आरसीबी विरुद्ध केकेआर हा सामना रद्द झाला होता. त्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा वृद्धीमान साहा यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे आयपीएल स्पर्धा आता रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
कालच कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार होता. मात्र, कोलकात्याच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना महामारीची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला होता.
तसेच, सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. २ मे रोजी त्यांची चाचणी करण्यात आली होती. सीएसकेच्या संघातील इतर खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे काल एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आयोजकांच्या चिंता वाढल्या होत्या.
यातच आज आणखीन तीन संघातील खेळाडूंची चाचणी सकारात्मक आल्यानंतर, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी, खेळाडूंच्या आणि सर्वांच्याच सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धा रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
IPL suspended for this season: Vice-President BCCI Rajeev Shukla to ANI#COVID19 pic.twitter.com/K6VBK0W0WA
— ANI (@ANI) May 4, 2021