मुंबई: मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. रायगडवरील 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर मराठा आरक्षणावर संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली. कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून उद्या संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात आहे. या आंदोलनाविषयी अजित पवारांनी भाष्य केलं आहे. आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन संभाजीराजेंना केलं होतं, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
उद्या कोल्हापुरात होणाऱ्या मूक आंदोलनाबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, संभाजीराजे यांनी आंदोलन करण्याऐवजी त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. पण आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीत सर्वांना आहे. त्यांनी आंदोलन करावं पण करोना वाढणार नाही याची काळजी घेऊन करावं. त्याचबरोबर उद्या होणाऱ्या आंदोलनात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील तसंच हसन मुश्रीफ हेही सहभागी होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर उदयनराजे आणि संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे त्यावर ५ जुलै रोजी होणाऱ्या राज्याच्या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. रायगडवरील 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर मराठा आरक्षणावर संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली. कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून येत्या 16 जूनपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल, असे संभाजीराजे म्हणाले होते. उद्यापासून कोल्हापुरातून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. हे आंदोलन शाहू समाधी स्थळी केले जाणार आहे. संभाजीराजे या आंदोलनाच्या तयारी पाहण्यासाठी आंदोलन स्थळी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी उद्याच्या मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींचा आढावाही घेतला.
यावेळी ते म्हणाले की कोल्हापुराला वैचारिक, पुरोगामी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून करत आहोत. त्याचबरोबर त्यांनी शांततेत आंदोलन पार पाडण्याचं आवाहनही केलं आहे. ते म्हणाले, आंदोलनादरम्यान कोणीही कोणत्याही लोकप्रतिनिधींना काहीही उलटसुलट बोलू नये. त्यांचा मान-सन्मान राखून त्यांच्याशी वागा. हे मूक आंदोलन शिस्तीत पार पाडायला हवं.
लोकप्रतिनिधींनीही बोलले पाहिजे?
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, उद्याचे आंदोलन हे मूक आंदोलन आहे. अनेकांना वाटते हा मोर्चा आहे. पण मूक आंदोलनाचा अर्थच आहे. मूक मोर्चा आपल्याला काढायचा असता तर, आपण काढू शकलो असतो. पण मोर्चा काढण्याची ही परिस्थिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पुन्हा लोकांना वेठीस का धरायचे? ज्या समाजाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांनी आपल्या 58 मोर्चांच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. समाज बोलला आहे, आणखी त्याने रस्त्यावर का उतरायचे? समाजाने आतापर्यंत आपली भूमिका मांडली आहे, त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनीही बोलले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. सर्वच आमदार, खासदारांना आपण उद्याच्या आंदोलनासाठी निमंत्रित केले आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते सर्वजण येतील.