नाशिक: नाशिक महानगर पालिका निवडणूक आता जवळ आलेली आहे. आतापासूनच दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्या इच्छुकांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याची सुरुवात केली आहे आणि मित्रपक्ष काँग्रेसची अडचण वाढवली आहे. हे झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी आता दुसरा धक्का इतर पक्षांना दिला आहे.
अद्वय हिरे व सुनील गायकवाड यांच्यातील मतभेद संपुष्टात आणत त्यांचा भाजपात प्रवेश घडवून आणून त्यांना नेतृत्व सोपवले आहे. श्री हिरे हे आता चांगलेच सक्रिय झाल्याने आगामी सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यात कडवा मुकाबला पाहायला मिळणार आहे. त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.
मालेगाव तालुका व परिसरातील आगामी सर्व निवडणूक भारतीय जनता पक्ष नेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. श्री. हिरे यांनी भारतीय जनता पक्ष सोडलेला नव्हता. नियोजित मालेगाव जिल्ह्यातील पक्षाची धुरा देखील आता ते सांभाळणार आहेत. सर्व निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावरच राहणार आहे. भाजपचे गटनेते सुनील गायकवाड व श्री हिरे यांच्यात असलेले गैरसमज देखील आता दूर झाले आहेत असं माजी मंत्री महाजन यांनी म्हटलं आहे.
गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्यासमवेत हिरे, गायकवाड, भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार यांच्यात जळगाव येथे गोपनीय बैठक झाली होती. त्यावेळी गिरीश महाजन यांनी वरीलप्रमाणे सूचना केल्याचे श्री पवार यांनी सांगितले आहे. बैठकीत नियोजित मालेगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती,, महानगर पालिका, बाजार समिती, शेतकरी संघ आणि इतरही सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका श्री हिरे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत.
अद्वय हिरे म्हणाले की सुनील गायकवाड व माझ्यातील गैरसमजुतीमधून मतभेद होते. ते आता दूर झाले असून, आम्ही एकदिलाने पक्ष बळकट करणार आहोत. आमच्यात आता कोणताही दुरावा नाही. सर्व पदाधिकारी अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत असं सुनील गायकवाड यांनी म्हटलं आहे.