येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. कोरोनाच्या संकटकाळात राममंदिराचे भूमिपूजन इतके महत्त्वाचे आहे का, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे.
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.
बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, श्रीराम दैवत आहे. पण रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे. आपण जगलो तर रामाचं दर्शन घ्यायला जाऊ. त्यामुळे केंद्र सरकारने आता माणसं जगवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मात्र, केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरून दुर्लक्ष करण्याकरता हा राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. तसेच या भूमिपूजन सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याविषयी बाळासाहेब थोरात यांना विचारले असता, तो त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.