मुंबई : महाराष्ट्र सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय २० एप्रिल रोजी घेतला होता. दहावी परीक्षांबाबत शिक्षण विभाग एक ते दोन दिवसात दोन महत्त्वाचे जीआर काढणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना कसं उत्तीर्ण करायचं याबाबतचे निकष ठरवणारा एक जीआर काढण्यात येईल. अकरावीचे प्रवेश कसे होणार, याबाबतचा दुसरा जीआर शिक्षण विभाग काढण्यात येणार आहे. शिक्षण खात्यांच्या अधिकाऱ्यांनी काल आणि आज अशी दोन दिवस राज्याच्या महाधिवक्तांबरोबर चर्चा केल्याची माहिती आहे. या दोन्ही जीआरची माहिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारनं कोरोना परिस्थितीचा विचार करुन दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यानिर्णयानंतर त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. वर्षा गायकवाड यांनी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेप्रकरणी आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर परिणाम होत आहे. ही बाब न्यायालयासमोर आणणार आहोत. विशेष म्हणजे, दहावीची परिक्षा होणार की नाही?, यावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाल्याचे पहायला मिळत आहे.
सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती असाधारण परिस्थिती आहे. इंटरनेट आणि इतर समस्यांमुळे ऑनलाईन परीक्षेचा विचार करता येत नाही. यामुळे दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे. मुंबई हायकोर्टात राज्य सरकार दोन्ही शासन निर्णयांची माहिती देणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामधील दहावीच्या विद्यार्थ्यांना कस उत्तीर्ण करायचं याविषयीचे निकष एका जीआरमध्ये असणार आहेत.