नवी दिल्ली : देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या प. बंगाल निवडणुकांच्या निकालात, दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने पुन्हा मोठया फरकाने विजय मिळवत, बंगालची सत्ता काबीज केली आणि मोदी शहांच्या इथे सत्ता स्थापन करण्याच्या आशा-आकांक्षांना सुरुंग लावला.
दुसरीकडे, भाजपाने तृणमूलसमोर कडवे आव्हान उभे केले होते. याचाच परिणाम म्हणून ज्या भाजपाला केवळ ३ जागा मिळवता आल्या होत्या, तिथे आता पक्षाला तब्बल ७७ जागा मिळाल्या असून, राज्यात एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भाजप उभारून आला आहे.
दरम्यान, बंगालमध्ये तृणमूलची सत्ता आल्यानंतरच्या २४ तासांतच राज्यात, हिंसाचाराच्या घटनांना बळ मिळाले असून, आत्तापर्यंत भाजपच्या ९ कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. यामुळे बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले असून, या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी, भाजपकडून ५ मे रोजी देशभरात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.
दुसरीकडे, ५ मे रोजीच बंगालमध्ये ममतांचा शपथविधी आहे. त्यामुळे याचदिवशी धरणे आंदोलन करून, निवडणूक विजयांनंतर बंगालमध्ये जो राजकीय हिंसाचार परत सुरु झाला आहे, त्याला विरोध भाजपकडून देशभर नोंदवला जाणारा आहे. तसेच, यावेळेस देशातल्या महामारीच्या परिस्थितीला अनुसरून जे काही प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत, त्यांचे पालन करूनच बंगालमधल्या हिंसाचाराचा निषेध केला जाईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी स्पष्ट केले.