पुणे : तौक्ते चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीलगतच्या सर्व राज्यांचे कमी-अधिक प्रमाणात आर्थिक आणि जीवित नुकसान झाले आहे. मात्र, या सर्व राज्यांचा दौरा सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ गुजरातला झालेल्या नुकसानीचा हवाई पाहणी दौरा केल्याबद्दल, राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
दुसरीकडे, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तौक्ते चक्रीवादमुळे राज्याच्या किनारपट्टी भागांतल्या अति नुकसान झालेल्या जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा उठवत, पंतप्रधानांवर केलेल्या टीकेचा बदला म्हणून भाजपच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यांच्या या आढावा दौऱ्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
“उद्धव ठाकरे कधी नव्हे ते दीड वर्षानंतर बाहेर पडले. त्यामुळे त्यांनी इतरांना उपदेश देण्याचं काहीच कारण नाही; की माझा हवाई प्रवास नाही, माझा जमिनीवरून प्रवास आहे. तुमच्या जमिनीवरच्या प्रवासाबद्दल आणि तुमचे पाय जमिनीवर आहेत, यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला खूप खूप आनंद आहे, की तुमचे पाय सरकार आल्यापासून जे हवेत गेले होते, ते जमिनीवर आहे. आमच्याही देवेंद्र फडणवीस व दरेकरांनी काही हवाई प्रवास केलेला नाही.” असा जबरदस्त टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. “मोदींनी कोणत्याही राज्याशी भेदभाव केला नाही. गुजरातमधील नुकसानाची हवाई पाहणी केल्यानंतर जी मदत जाहीर केली ती संपूर्ण देशासाठी आहे. या चक्रीवादळाचा ज्या राज्यांना फटका बसला, त्या राज्यांतल्या मृतांच्या वारश्यांना त्यांनी प्रत्येकी २ लाखांची तर जखमींसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना वादळामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविल्यानंतर तातडीने आर्थिक मदत देण्याची ग्वाहीही दिली आहे,’ असे सांगत, ‘पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा नियोजित होता मात्र, हवामान खात्याने त्यावेळी राज्याच्या सागरी पट्ट्यात हवाई प्रवास करण्याबाबत प्रतिकूल अहवाल दिल्यामुळे तो दौरा रद्द झाला आणि पंतप्रधान गुजरातकडे रवाना झाले,’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
Read Also :
- काम करतयं राष्ट्रवादीचा आमदार अन् कौतूक करतयं भाजपचा आमदार..
- प्रक्रिया पारदर्शक, वशिलेबाजीला थारा नाही; पिंपरी-चिंचवडकरवासीयांचे स्वतःच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण
- अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त! ‘डॅडी’ची दगडी चाळ इतिहासात जमा?
- अजित दादांचं असं झालयं… मेंढराचं नेतृत्व लांडग्याने करावं आणि लांडग्याकडून….
- म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा, राज्यात ब्लॅक फंगसचा धोका वाढला!