राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षांबाबत केलेल्या चुकीच्या दाव्यामुळे त्यांना पदावरून तात्काळ हटविण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवले होते. या पत्रावरून आता उदय सामंत यांनी भातखळकर यांना टोला लगावला आहे.
सामंत यांनी ट्विट केले की, “अशी कितीही पत्र द्या, माझ्या भूमिकेत बदल होणार नाही. कालही विद्यार्थ्यांसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार… अतुलजींना शुभेच्छा”, या ट्विटसह त्यांनी आपण परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
अशी कितीही पत्र द्या माझ्या भूमिकेत बदल होणार नाही.. कालही विद्यार्थ्यांसोबत होतो, आज ही आहे आणि उद्या ही राहणार.. अतुलजींना शुभेच्छा… pic.twitter.com/62eIizRQNT
— Uday Samant (@samant_uday) July 15, 2020
राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात भातळखर म्हणाले की, उदय सामंत यांनी काही दिवसांपुर्वी दावा केला होता की राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही असे निवेदन पाठवले आहे. मात्र नागपूर, अमरावती व गोंडवाना विद्यापीठीच्या कुलगुरूंनी स्पष्टपणे सांगितले आहे की, असे कुठल्याही प्रकारचे निवेदन त्यांनी दिलेले नाही. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत पहिल्या दिवसापासून दुर्दैवानं राजकारण करत असून, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार लक्षात न घेता ते राजकीय व पक्षीय दृष्टीकोनातून विषयावर निर्णय करत आहेत. त्यामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये राजकारण करण्याचा हा घृणास्पद प्रकार आहे.
कायद्याने विद्यापीठ स्वायत्त असताना खरं तर कुलगुरूंच्या बाबतीत मंत्र्यांनी ढवळाढवळ करणे केवळ अयोग्य नाही, तर बेकायदेशीर आहे. याच मंत्र्याच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या खर्चाच्या व निविदांच्या बाबतीत माहिती मागवली होती. कुलपती म्हणून आपण सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहात, अशा वेळेस उच्च शिक्षण मंत्र्यांनी खोटी विधान करून केवळ विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पोरखेळ केला नसून, आपल्या अधिकारांवर अतिक्रमण करून बेकायदेशीर गोष्ट केली आहे. त्यामुळे आपण आपल्या अधिकारात त्यांची या पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी मी आपल्याकडे करत आहे, असे भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे.