पंढरपूर : महाराष्ट्रात सध्या पंढरपूर पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यातल्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी पंढरपुरात आपला तळ ठोकला असून, प्रचारसभांचा धुरळा निवडणुकीच्या मैदानात उडत आहे.
आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात प्रचारसभा घेणार असून, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटलांनी विरोधी पक्षावर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांना ते काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, आज त्यांची सकाळी मंगळवेढ्यातल्या बोराळे इथे सभा झाली. या सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, पंढरपूर पोटनिवडणूक ही जनतेसाठी एक संधी आहे. लोकहितविरोधी सरकारविरोधात मतदान करा. राज्यातलं हे सरकार, महाविकास आघाडी नाही तर महावसुली सरकार आहे. ते पोलिसांकडून, शेतकऱ्यांकडून, जनतेकडून केवळ वसुली करण्यासाठी काम करत आहे, असे म्हणत त्यांनी आघाडी सरकारवर हल्लबोल केला.
तसेच, देशात सर्वाधिक करोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात, सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात. ही अवस्था या राज्याची सरकारने करून ठेवली आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला.
त्याचसोबत महाराष्ट्रात लोकशाही नव्हे तर लॉकशाही सुरू आहे. कितीही आवश्यक असला, तरी जेव्हा लॉकडाऊन होतो तेव्हा जे लोक रोजंदारीवर जगतात, अशा सामान्य माणसांना सरकारने आपल्या तिजोरीतून मदत केली पाहिजे. अशा अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचं भान या सरकारला नाही; पण मदत तर सोडाच, सरकारनं अशा लोकांकडून वीजबिलाची वसुलीदेखील मुघलांप्रमाणे केली आहे असा टीका त्यांनी केली.
यावेळी त्यांनी लोकांना आव्हान दिले की, सध्या निवडणूक असल्यामुळे पंढरपूरात वीज तोडणी करण्यात येत नाहीये. परंतु एकदा १७ तारीख उलटू द्यात, त्यांनतर जर पंढरपूर मतदारसंघात सरकारने वीज कनेक्शन कापलं नाही, तर माझं नाव बदलून टाका. हे सरकार लबाड आहे. अजितदादा खूप काही बोलतील; पण ते लबाडांचे अवसान घेत आहेत, अशी टीका त्यांनी आघाडी सरकारवर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे. पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे.