मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने कर्नाटक, गोवा आणि राज्याच्या प.किनारपला मोठा तडाखा दिल्यानंतर, अखेर ते गुजरातला जाऊन धडकले आणि मोठी हानी करून शमले. या चक्रीवादळाने कोकणात केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे कोकण दौऱ्यावर असून, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील कोकण दौऱ्यावर आहेत.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी, रत्नागिरीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली. “हेलिकॉप्टरमधून पाहणी करुन तर नाही ना गेलो, जमिनीवर उतरलोय”, असं सांगत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. तसंच “पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार,” असा खोचक टोला देखील त्यांनी पंतप्रधानांना लगावला.
दरम्यान, आज देवगड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना, याचा समाचार देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, “पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले असा सवाल करता? मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले? इतर जिल्ह्यात का जात नाही?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.
तसेच, “मुख्यमंत्री नुसत्या बाता मारतात. गतवर्षी येऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळाची नुकसानभरपाई अजूनही सरकारने दिलेली नाही. मुख्यमंत्री केवळ मोठमोठी राजकीय विधानं करतात. या वादळाने अपरिमित हानी झालेल्या कोकणचा मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आहे. केवळ तीन तासांचा दौरा आणि किती किलोमीटरचा दौरा हे मोजून सांगू का?,” असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
Read Also :
- हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरुन पाहणी करणार; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला
- “कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, केवळ फोटो सेशनसाठी नाही”
- “कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, केवळ फोटो सेशनसाठी नाही”
- लसीच्या पुरवठ्यावरून सचिन सावंतांनी फडणवीसांना विचारला ‘हा’ साधा प्रश्न
- ‘गुजरातला हजार कोटी व महाराष्ट्राला काहीच नाही, हा सापत्नभाव फडणवीसांना तरी पटेल काय?’