मुंबई – मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह महाविकास आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर प्रविण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
सध्याच्या शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीचा विसर पडला आहे. संपूर्ण पक्ष हा शरद पवार यांच्यापुढे लीन झाल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. शिवसेना स्वत:चा इतिहास विसरत चालली आहे. त्यामुळे आता ते मागचे काहीच काढत नाहीत, अशी टीका दरेकर यांनी केली
केंद्राने शेतकऱ्यांसाठी आणलेला कायदाच शेतकऱ्यांसाठीचा आत्मा आहे. बंदमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा पुळका नाही. ते केवळ स्वार्थासाठी हे करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना राजकीय पक्षांच्या कथनी आणि करणीतला फरक कळतो, असे दरेकर यांनी सांगितले.
भाजपला सोडून शिवसेना जेव्हा महाविकास आघाडीसोबत गेली तेव्हा त्यांचे हिंदुत्वाविषयीचे आचारविचार कळले. राज्य सरकारने स्वत:च्या काळजात काय चाललंय यापेक्षा शेतकरी आणि जनतेच्या मनातील गोष्टी जाणून घ्याव्यात. काही दिवसांपूर्वी कृषी कायदे आणण्यासाठी याच राजकीय पक्षांनी खुलेआम पत्रक काढले होते, समर्थन दिले होते. त्यामुळे आजचा बंद हा शेतकऱ्यांचा आडून राजकीय हित साधण्याचा प्रयत्न असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली.