मुंबई : गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून फळबागांचे, मच्छीमारांच्या बोटींचे, अनेक घरांचे आणि इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, तसेच, कुणालाही मदतीपासून दूर ठेवले जाणार नाही. राज्य सरकारकडून प्रत्येक नुकसानग्रस्तांना योग्य आणि वेळेवर मदत मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
दरम्यान, यानंतर राज्य सरकारने संपूर्ण आढावा घेऊन कोकणातील वादळग्रस्तांना २५२ कोटींची मदत जाहीर केली. मात्र, आता यावरून भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून, ‘ठाकरे सरकारची ही मदत फसवी आहे. यातून कोकण वादळग्रस्तांच्या पदरात काहीच पडणार नाही,’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
तसेच, राज्य सरकारने केलेली ही मदत पूर्णपणे तोकडी असून, नुकसानीचे प्रमाण न पाहताच राज्य सरकारने जाहीर केलेली ही मदत म्हणजे कोकण वादळग्रस्तांची क्रूर थट्टा असून, यातून कोकणी जनतेबद्दल आघाडी सरकारला असणारी अनास्थाच प्रकट झाली आहे,’ असे सांगत, ‘विभागीय आयुक्तांकडून नुकसानीबाबत सादर केलेला अहवाल आणि मंत्र्यांनी सांगितलेले नुकसानीचे आकडे यात मोठी तफावत आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी, राज्य सरकारने जाहीर केलेला हा नुकसान भरपाईचा आकडा कोणत्या अहवालाच्या आधारे आहे, हे सरकारने जाहीर करावे. मागच्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाची मदत अजून सरकारकडून पूर्ण दिली गेली नाहीये. त्यामुळे, आता यावेळी जाहीर केलेली २५२ कोटींची मदत तरी किती तातडीने वादळग्रस्तांना मिळणार हे काय माहित, परंतु, त्यांना तातडीने ही मदत न मिळाल्यास आम्ही मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करू,’ असा इशारा देखील त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
Read Also :
- ६ जूनपर्यंत ५ मागण्या पूर्ण करा, नाहीतर रायगडावरून आंदोलनाची सुरुवात!
- “मी देवेंद्रजींना हात जोडून विनंती केली, तुझं-माझं न करता आपण समाजासाठी एकत्र येऊ.”
- राम शिंदे यांनी कुकडीच्या पाण्याच्या बाबतीत हुरळून जाऊ नये; घनशाम शेलार यांचा सणसणीत टोला
- संभाजीराजेंनी मांडली निर्णायक भूमिका; पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे…
- ‘अजूनही वेळ गेलेली नाही, हातात हात घालून काम करू’