राजस्थानातील आमदारांना विकत घेऊन काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमवले आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले, केंद्रातील भाजपचे सरकार सत्ता पैसा आणि सीबीआ, ईडी, प्राप्तीकर यांचा वापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते यासाठी वापरले जात आहेत. कर्नाटकातील काँग्रेस जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा वापर केला गेला आहे.
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमा करून राजस्थान सरकार पाडण्यासाठी पाठविले आहेत, अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाली असून आपण यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे.
या गंभीर प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालावे, अशी विनंती आपण त्यांना केली आहे. त्यांनी ती मान्य केली आहे, असे सांगून लोकशाहीत असे अघोरी प्रकार करणा-यांचे भाजपातील मास्टमाईंड शोधले पाहिजेत, अशी मागणी सावंत यांनी केली.