नाल्यात कोणी नागरिक पडल्यास त्याला महापालिका जबाबदार नसल्याचे फलक लावणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी भाजप आमदार योगेश सागर यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे. महापालिका व कंत्राटदार यांच्यातील करारानुसार ही जबाबदारी कंत्राटदाराची असते, असेही त्यांनी सांगितले .
महापालिकेची वरील भूमिका अत्यंत दुर्देवी आहे. अशा प्रकारे महापालिका आपली जबाबदारी झटकू शकत नाही. मॅनहोल, नाले, गटारे बांधणाऱ्या कंत्राटदारात व महापालिकेत झालेल्या करारानुसार ही जबाबदारी कंत्राटदाराची असते. महापालिका व कंत्राटदार हे आपापली जबाबदारी एकमेकांवर ढकलू शकत नाही, किंवा आपली जबाबदारी नाही, असे म्हणू शकत नाहीत. त्यामुळे असा फलक लिहून जबाबदारी नागरिकांवरच टाकणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे असा दिशाहीन व असंयुक्तिक फलक लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, असेही योगेश सागर यांनी या पत्रात लिहिले आहे.
काही वर्षांपूर्वी गोरेगाव पूर्व येथील वसाहतीत उघड्या गटारात पडून एक बालक मृत्युमुखी पडले होते. त्याच ठिकाणी महापालिकेने काल असा फलक लावला आहे. गोरेगाव परिसरातील छोट्या-मोठ्या नाल्यांच्या पाण्यात अतीवृष्टीमुळे वाढ होऊ शकते. याबाबत नागरिकांनी लहान मुले, अंध, दिव्यांग व्यक्तींची काळजी घ्यावी. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असे या फलकावर लिहिले होते. यासंदर्भात योगेश सागर यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.