उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात सोमवारपासून १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. दूध,मेडिकल या अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व काही पुन्हा एकदा बंद होणार असल्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मात्र भाजप खासदार गिरीश बापट यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.
“पालकमंत्री अजित पवार यांनी फक्त अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. हम करे सो कायदा असून हे बरोबर नाही. केवळ चार टक्के बाधित रुग्णांसाठी 96 टक्के लोकांना वेठीस धरणे चुकीचं आहे. असे एकतर्फी निर्णय जर पुढे घेण्यात आले तर काय करायचं हे आम्ही ठरवू”, असा इशारा खासदार गिरीश बापट यांनी दिला.
“कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करायला पाहिजेत. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून योग्य अंमलबजावणी होऊ शकते. मात्र त्यांना विश्वासात घेतलं जात नाही. केवळ दिवस पुढे ढकलल्याने संख्या कमी होणार नाही. सर्व पुणे शहराला वेठीस धरले जात आहेत”, असं गिरीश बापट म्हणाले.
“लॉकडाउन जाहीर करताना खासदार आमदारांच्या सूचना विचारल्या नाहीत. केंद्रात नरेंद्र मोदींनी सर्व विरोधी पक्षनेत्यांना बोलवलं, त्यांचा सल्ला घेतला. मात्र तसं पुण्यात होत नसून, मनमानी कारभार असल्याचा आरोप बापट यांनी केला.