मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेली आणि सत्ताधारी – विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांनी, प्रतिष्ठेची बनवलेली, पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक, भाजपने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना धोबीपछाड देत जिंकली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या विधानसभा पोटनिवडणुकीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा भाजपचे समाधान आवताडे यांनी, पराभव केला. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजप लवकरच कमळ फुलवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, निवडणूक जिंकल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी देखील अशाप्रकारचे थेट भाष्य करणे टाळले असले, शब्दांचे खेळ करत त्यांनी, देवेंद्र फडणवीस बोलत असतील, तर त्यामध्ये तथ्य असेलच, असे सूचक वक्तव्य केले आहे. यावरून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेत्यांना सुनावले आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस बरेच प्रयत्न करत आहेत. मात्र, शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र असेपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही, असा दावा हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
तसेच, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव हा जनतेने नाकारल्यामुळे झालेला नाही, तर रणनीती आखण्यात महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडली. भगीरथ भालके यांच्याऐवजी त्यांच्या मातोश्रींना उमेदवारी दिली असती, तर कदाचित विजय जवळ आला असता. मात्र, आम्ही लोकांनी दिलेला निकाल स्वीकारला आहे, हे देखील मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.