राज्य सरकारचा गैरकारभार जनतेपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. आपल्या नेत्यांविरुद्ध होणाऱ्या अपप्रचाराला कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे मांडले पाहिजे , असे वक्तव्य चद्रकांत पाटील यांनी सोमवारी भाजपा प्रदेश पदाधिकारी बैठकीत बोलताना केले.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले , “फेब्रुवारी मध्ये नवी मुंबईत झालेल्या अधिवेशनात पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.पक्षाच्या आंदोलनामुळे सरकारला नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाचा विचार करणे भाग पडले. या पुढील काळात दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रखर आंदोलन उभे केले पाहिजे. त्याचबरोबर राज्य सरकारचा गैरकारभार जनतेपर्यंत नेणेही आवश्यक आहे. आपल्या नेत्यांविरुद्ध होणाऱ्या अपप्रचाराला कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन उत्तर द्यावे, तसेच लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात आपल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सेवा कार्यात सहभाग घेतला.आता या पुढील काळातही कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून जनतेची मदत केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग होईल तसेच विलगिकरण केंद्रे सुरू करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. रुग्णांची सेवा अधिकाधिक पद्धतीने करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत राहिले पाहिजे.असेही त्यांनी नमूद केले