प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे आज निधन झाले असून किडनीच्या समस्येमुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे . शनिवारी त्यांनी जयपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला.प्यार तूने क्या किया’ ,रोड ,उम्मीद, लव इन नेपाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दिग्दर्शकाची भूमिका बजावली होती.
रजत मुखर्जी हे मुंबईत वास्तव्यास होते, परंतु लॉकडाऊनमुळे ते त्यांच्या गावी जयपूरला गेले होते. त्यांच्या मृत्यूमुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. अभिनेता मनोज वाजपेयीने सोशल मीडियाच्या रजत मुखर्जी यांना श्रद्दांजली वाहिली आहे. ते दोघे चांगले मित्र होते.
माझा चांगला मित्र आणि दिग्दर्शक रजत मुखर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपसून ते आजारी असल्यामुळे जयपूरमध्ये त्यांचं निधन झालं. आता पुन्हा कधी या दोन मित्रांची भेट होणार नाही याची खंत आहे. जिथे आहेस तिथे खूश राहा’ असं ट्विट मनोज वाजपेयीने केलं आहे.
दरम्यान, २०२० मध्ये बॉलिवूडने अनेक दिग्गज कलाकारांना गमावले आहे. अभिनेता इरफान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंह राजपूत, नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांच्या निधनानंतर बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.