पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री (17 जुलै) संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या संमेलनाला संबोधित केलं. भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर पंतप्रधान मोदींचं हे पहिलंच भाषण होतं. त्यामुळे हे भाषण महत्त्वाचं होतं.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कोरोना संकटातील आव्हानांवर भाष्य केलं. यासोबतच पंतप्रधान मोदींनी आगामी काळातील भारताच्या विकास धोरणांविषयी मत मांडलं.“कोरोनाविरोधात आपली संयुक्त लढाई आहे. या संकट काळात आम्ही 150 पेक्षा जास्त देशांना वैद्यकीय आणि इतर मदत पुरवली’, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
“आज आपण संयुक्त राष्ट्रसंघाचा 75 वा वर्धापन दिवस साजरा करत आहोत. भारत हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या 50 संस्थापक सदस्यांपैकी एक सदस्य आहे. त्यानंतर बरच काही बदललं. आज संयुक्त राष्ट्रसंघाचे 193 देश सदस्य आहेत”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“भारतात आम्ही प्रत्येक क्षेत्रात काम करत आहोत. विकासाच्या पार्श्वभूमीवर ‘अजेंडा 2030’ ही मोहिम आम्ही सुरु केली आहे. 2022 सालापर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीजवळ स्वत:चं घर राहील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.