देशासह राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. सरकारकडून योग्य त्या उपाययोजना राबवून देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालला आहे. आता यापार्श्वभूमीवर जोपर्यंत कोरोनावर औषध मिळत नाही, तोपर्यंत आपण कोरोनावर विजय मिळवू शकत नाही, असे मोठे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परीसरात उभारण्यात आलेल्या उस्मानाबाद कोविड-19 तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपण कितीही प्रयोगशाळा उघडल्या तरी त्या पुऱ्या पडणार नाहीत, त्यामुळे जनतेला सोबत घेऊन, तसेच जनतेने सतत हात धुणे, दोन व्यक्तीमध्ये अंतर ठेवणे आणि मास्क लावण्यासाठी जनजागृती करणे, नियम कठोरपणे पाळणे गरजेचे आहे. प्रत्येकाने यापुढील काळात स्वयंशिस्त पाळली पाहिजे.
कोरोना हा पहिला व्हायरस नाही, यापूर्वी एचआयव्ही,स्वाईन फल्यू यासह इतर व्हायरस होते. यापूर्वी आपण वेळ मारून नेली त्यामुळे आपल्याला यावर विजय मिळविला असे वाटले. त्याचवेळी याची चाहूल ओळखू शकलो असतो, तर लस संशोधनासाठी प्रयत्न केले असते, त्यामुळे यापुढे सतत संशोधन होत राहिले पाहिजे, तसेच हा काळ गेल्यानंतर प्रत्येक प्रयोग शाळेत एक विभाग संशोधनासाठी सुरु ठेवला पाहिजे.
कोरोनाची तपासणी करण्यासाठी राज्यात १३१ प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. भविष्यात राज्याला देशातीलच नाही, तर जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असलेले केंद्र बनवणिणार असल्याचे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.