राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून वाद सुरू आहे. असे असले तरी 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्सवात हा कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी उत्तर प्रदेशासह देशभरात जयत्त तयारी सुरू आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील हा सोहळा दिवाळीप्रमाणे साजरा करा असे म्हटले आहे. मात्र सोबतच कोरोनापासून वाचण्याची देखील काळजी घ्या असे आवाहन केले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपल्या जीवनातील हा सर्वात महत्त्वपूर्ण दिवस व्यक्तिगत रूपाने घरी कुटुंबियांसह दिवाळी प्रमाणे साजरा करा. हा सोहळा सामूहिकरित्या साजरा करणे मुख्यत्वे टाळा आणि कोरोना बाबत काळजी घ्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले की, हा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. अयोध्येत श्री राम जन्मभूमीत भव्य मंदिर निर्माण करण्यासाठी आपण सर्व एकजूट होऊन लढलो. त्याच राम मंदिराचे भूमिपूजन मा. मोदी जी यांच्या हस्ते होत आहे. मंदिराचा भूमिपूजन सोहळा आपण मोठ्या स्तरावर आणि धुमधडाक्यात साजरा करू शकलो असतो, मात्र कोरोनाची गंभीरता लक्षात घेऊन हा सोहळा व्यक्तिगतरित्या घरीच साजरा करावा.
मंदिराचा भूमिपूजन सोहळा म्हणजे आपल्या घरातच दिवाळी आहे, असे समजून घरी आपल्या कुटुंबियांसह मोठ्या उत्साहाने साजरा करा. आपले घर दिव्यांनी प्रज्वलित करा, गुढी उभारा, आपापल्या घरावर कंदील-पताका लावा, रांगोळ्या काढा आणि सर्व कुटुंबियांसह मिळून टीव्हीवर हा कार्यक्रम पहा, असेही ते म्हणाले.