राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, अनेक भागांमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. अर्थव्यवस्था आणि जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा याचा विचार करुन ही शिथिलता देण्यात आली आहे. अनेक भागात सम-विषयी पद्धतीने दुकानं उघडतात.
तसेच आता श्रावण महिना सुरु झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून पूजापाठ बंद आहे. सर्व धार्मिक स्थळे मंदिरे बंद आहेत याच पार्शवभूमीवर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. “श्रावण महिना सुरु झाला आहे. सणवारांचा हा महिना आहे. त्यामुळे मंदिरं खुली करा, मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि विधी करण्यास परवानगी द्या”, अशी विनंती चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रामार्फत केली आहे
“आता श्रावण महिना सुरु झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून पूजापाठ बंद आहे. निदान श्रावण महिन्यात तरी महादेवांचं दर्शन आणि पूजन व्हायला हवं. श्रावण महिन्यात महादेवाचं पूजन आणि दर्शनाला खूप महत्त्व असतं. त्यामुळे श्रावण महिन्यात लाखो नागरिक महादेवाची पूजा करतात आणि मंदिरात दर्शनासाठी जातात”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.
“सोशल डिस्टन्सिंग पाळून भाविकांना मंदिरात सोडलं जावं. भाविकांना महादेवाच्या पिंडावर निदान बेलाचं पान वाहता यावं. महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आहेत. सर्व ज्योतिर्लिंगांची पूजा करुन कोरोना नष्ट व्हावा, अशी प्रार्थना करु. पूजेसाठी नियम पाळता येतील. सोशल डिस्टिन्सिंग पाळून धार्मिक विधी करता येतील”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.